नवी दिल्ली : पाकिस्तानकडून वारंवार केले जाणारे शस्त्रसंधीचे उल्लंघन ही जरी आपल्यासाठी नित्याचीच बाब झालेली असली तरी देखील, सतत इशारा देऊनही पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाचा समोर आलेला आकडा हा थक्क करणारा आहे. पाकिस्तानकडून या वर्षात 10 ऑक्टोबर 2019 पर्यंत तब्बल 2 हजार 317 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे.
भारतीय जवानांकडून एलओसीवरील व काश्मीर खोऱ्यातील विविध कारवायांमध्ये 147 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारतीय सैन्यदलातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआय वृत्तसंस्थेकडून ही माहिती देण्यात आली आहे.
काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण करण्यासाठी जवळपास 500 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्यदलातील अधिकाऱ्यांकडून एलओसीवरील जवानांना दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पूर्णपणे मोकळीक देण्यात आल्याची देखील माहिती आहे. दहशतवाद्यांची एक मोठी टोळी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटवल्यापासून पाकिस्तानसह दहशवादी संघटना अधिकच चवातळल्याचे दिसत आहे. काश्मीर खोरे अशांत ठेवण्यासाठी त्यांच्याकडून सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान नव्या बनावट नोटांद्वारे भारताला आर्थिक नुकसान पोहचवण्याचा प्रयत्न करत असल्याची देखील माहिती समोर आली होती. याचबरोबर पाकिस्तानी सैन्याकडूनही भारतात घातपात घडवण्यासाठी दहशतवादी संघटनांना पाठबळ दिले जात आहे.