नवी दिल्ली – अफगाणिस्तानात काय घडतेय हे सगळे जग आपल्या डोळ्यांनी पाहते आहे. काबूल विमानतळावर होणारी गर्दी, आपला जीव वाचवण्यासाठी कासाविस झालेले अफगाण नागरिक, किमान आपले मूल तरी जगावे म्हणून अनोळखी व्यक्तींच्या हाती ते मूल सोपवणाऱ्या अगतिक आया आणि अनिश्चित भवितव्याच्या दिशेनेच या सगळ्यांचा सुरू असलेला प्रवास ही दृश्ये कोणत्याही संवेदनशील माणसाला हादरवून सोडणारी आहेत. त्यामुळे जगाच्या अन्य भागातील लोक आणि माध्यमेही यातच गुंतून पडली आहेत. मात्र त्याचवेळी एक नवे धोकादायक समीकरणही येथे तयार होउ पाहत आहे. त्याकडेही गांभीर्याने पाहावे लागणार आहे.
अफगाणिस्तानातील नागरिकांना तालिबानने जाहीर माफी दिली आहे. आम्ही कोणाचाही विनाकारण छळ करणार नाही असे त्यांचे म्हणणे आहे. मात्र 1996 ते 2001 या कालखंडातील त्यांच्या राजवटीच्या कटू आठवणी अजुनही ताज्या असताना त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवण्याची अद्याप कोणी हिंमत केलेली नाही. मुळात तालिबान आता दिला शब्द पाळेल का, याबाबतच सगळे साशंक आहे. हे एकीकडे सुरू असताना पाकिस्तान, चीन आणि तालिबान यांची वेगळीच चुंबाचुंबी सुरू झाली आहे.
अफगाणिस्तानात संपूर्ण अनिश्चितता आहे. पुढे काय होणार याचा कोणालाच अंदाज नाही. देशात कोणती राजवट नाही की नियमावली नाही. लोक अंध:काराच्या दिशेने प्रवास करत असतानाच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मुक्ताफळे उधळली आहेत. अफगाणच्या जनतेने गुलामगीरीच्या बेड्या तोडून टाकल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 1970 आणि 80च्या दशकात अफगाणिस्तानात जम बसवू पाहणारा आणि त्यात अपयशी ठरलेला रशियाही आज तालिबानच्या सूरात सूर मिसळताना दिसतो आहे. चीनही तालिबानशी जुळवून घेण्याचे संकेत देतो आहे. त्यांना त्यांची गुंतवणूक शाबुत ठेवायची आहे.
तालिबानच्या अगोदरच्या राजवटीत केवळ पाकिस्तान, सौदी अरब आणि यूएई या तीनच देशांनी त्यांना मान्यता दिली होती. आता कोणताही इस्लामिक देश अद्याप ठोस भूमिका घेत पुढे आलेला नाही. मात्र पाक, चीन आणि रशिया यांनी दिलेले संकेत भविष्याची काळजी वाढवाणारे आहेत. इराणनेही त्यांच्या कह्यात जाणारी भूमिका सूचित केली आहे. त्यावरून भारत, अमेरिका आणि जपान या देशांसाठी भविष्यात ही नवी जुळणी तापदायकच ठरण्याची शक्यता आहे. त्याचे कारण म्हणजे चीन. या तीन्ही देशांचे वेगवेगळ्या पातळीवर चीनशी मतभेद आहेत. गेली अनेक वर्षे चर्चा सुरू असली तरी ते मिटलेले नाहीत. जर चीन आताच्या अस्थिर वातावरणात नवी चाल खेळत असेल तर जगालाच सावध राहावे लागणार आहे.