इस्लामाबाद- फ्रान्सकडून घेतलेल्या राफेल विमानांनी हल्ला करण्याचे कारस्थान भारत रचत असल्याचा आरोप पाकिस्तानचे हवाईदल प्रमुख मुजाहिद अनवर खान यांनी केला आहे.
तणाव वाढविण्यासाठी भारत आक्रमक स्वरूपाच्या कारवाईची योजना आखत असून ते आता पाच किमी आतपर्यंत आपल्या हद्दीत येतील व त्यांची हवाई ताकद सिध्द करतील असा दावाही खान यांनी केला आहे. राफेल विमाने भारताच्या ताफ्यात दाखल होत असताना भारताच्या या सज्जेतेचा पाकने किती धसका घेतला आहे, हेच यातून सिध्द होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
काही महिन्यांत भारताला फ्रान्सकडून युध्दसाम्रगीने सज्ज अशी आणखी काही राफेल विमाने मिळतील. त्यामुळे येत्या 18 ते 24 महिन्यांच्या कालावधीत ते आक्रमक कारवाई करतील असा आपला अनुमान असल्याचेही खान यांचे म्हणणे आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात काश्मीर हा नेहमी संघर्षाचा मुद्दा राहीला आहे. मात्र आता भारत त्यांची कारवाई त्याच्याही म्हणजे काश्मीरच्या पलिकडे कदाचित आंतरराष्ट्रीय सीमेपर्यंतही नेउ शकतो असे खान म्हणाले.
भारताचे एअरचीफ मार्शल आर. के. एस. भदौरिया यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी भारतीय वायुसेनेची सज्जता आणि राफेलच्या समावेशाबाबत बोलतानाच एकाच वेळी चीन आणि पाकिस्तान या दोन्ही आघाड्यांवर लढण्याच्या क्षमतेबाबत भाष्य केले होते. राफेलच्या समावेशामुळे अगोदर आणि अगदी आतपर्यंत तडाखा देण्याची आपल्याला क्षमता प्राप्त झाली असल्याचे भदौरिया म्हणाले होते.
दोन आघाड्यांवर लढाव्या लागणाऱ्या युध्दासह कोणत्याही शक्यतेचा सामना करण्यासाठी आपण आता सज्ज आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर मुजाहिद अनवर खान यांनी अनुमानांचा तर्क बांधत स्वर्ग गाठण्याचा प्रयत्न केला आहे.