जम्मू : पाकिस्तानने पुंछ व राजौरी जिल्ह्यातील विविध सीमावर्ती गावांमध्ये केलेल्या गोळीबारात भारतीय हद्दीतील 16 जनावरे ठार झाली आहेत. पुंछ जिल्ह्यात पाकिस्तानी बाजूकडून होणाऱ्या गोळीबाराचे प्रमाण खूपच अधिक असल्याने त्या भागातील सहा सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
पाकिस्तानी बाजूकडून नौशेरा, बालाकोटे, शहापुर, आणि केरनी या भागात गोळीबार करण्यात आला. त्यांच्या गोळीबाराला भारतीय बाजूकडून चोख प्रत्युत्तर देण्यात आले. शुक्रवारी रात्री आठ ते दहा या काळात हा गोळीबार पाकिस्तानी बाजूकडून करण्यात आला. शनिवारी सकाळी पावणेदहा वाजता सुद्धा हा गोळीबार करण्यात आला अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. दोन्ही बाजूंमधील ही चकमक शनिवारी दुपारपर्यंत सुरू होती. मात्र त्यात सुदैवाने मनुष्य हानी झाली नाही. भारतीय सैन्याने केलेल्या गोळीबारात पाकिस्तानी बाजूकडे काय हानी झाली याची माहिती मात्र अजून मिळू शकलेली नाही.