पुणे, दि. 1 -गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा वारंवार खंडीत होत आहे. त्यामुळे महावितरण आणि महापालिकेत नव्याला वादाला तोंड फुटले आहे. “महापालिकेने शहरात बेसुमार खोदाई केल्याने ठिकठिकाणी भूमिगत वीज वाहिन्यांचे नुकसान झाले आहे,’ असा आरोप महावितरण करत आहे. तर, “यात पालिकेचा काहीही संबंध नाही. महावितरणच अनियमित वीजपुरवठा करत आहे. तक्रारी करूनही महावितरण दुर्लक्ष करत आहे,’ असा दावा पालिका प्रशासन करत आहे.
या दोन्ही विभागांच्या वादात जलकेंद्राची वीज यंत्रणा बंद पडल्यास पुणेकरांना अघोषित पाणी कपातीचा सामना करावा लागत आहे. प्रत्येक आठवड्यात शहरात कुठे ना कुठे ऐन सणासुदीत पाणीबंद होते. जलशुद्धीकरण केंद्राला 24 तास वीज पुरवठा आवश्यक असतो. त्यासाठी वीज यंत्रणेची नियमित दुरुस्ती आवश्यक असताना दोन्ही प्रशासनांत समन्वय नसल्याने ही स्थिती उद्भवत आहे.
…तर चार दिवस जलकेंद्र बंद ठेवा
वारजे, पर्वती जलकेंद्राचा पाणी पुरवठा वारंवार विस्कळीत होत आहे. त्याबाबत महावितरणकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, काम करायचे असेल तर चार दिवस केंद्र बंद ठेवा असा सल्ला महावितरण देत असल्याचे महापालिका अधिकारी सांगत आहेत. वारजे जलकेंद्राचा वीजपुरवठा खंडीत होत असल्याने कोथरूड, शिवाजीनगर, मॉडेल कॉलनीच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला. यावर महापालिकेने महावितरणच्या कोथरूड कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवित जलकेंद्रासाठी एक्स्प्रेस फीडर असतानाही वीज वारंवार खंडीत होत असल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
महापालिकेवरच खापर
वीजपुरवठा खंडीत होत असल्याचे खापर महावितरण अधिकारी पालिकेवरच फोडत आहेत. अनेक वीज वाहिन्या महापालिकेने जलवाहिन्या खोदाईत तोडल्या. त्यांना धोका निर्माण होईल अशा पद्धतीने खोदाई केल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांना सुनावले आहे. मात्र, महावितरणाचा हा दावा चूक असून वारंवार सूचना करूनही त्यांच्याकडूनच वीजपुरवठा सुरळीत केला जात नाही, असा दावा मनपा पाणीपुरवठा विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी केला.
देखभाल दुरुस्तीचे
नाटक कशाला?
शहरात दर गुरुवारी महावितरण तसेच महापालिकेकडून जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत विषयककामांचे कारण देत कोणत्या ना कोणत्या भागात पाणी बंद ठेवले जाते. त्यासाठी नियमित देखभालीचे काम असल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्यानंतर आठवड्यात दोन ते तीन वेळा वीजपुरवठा खंडित होऊन त्याचा परिणाम पाणी पुरवठ्यावर होतो. त्यामुळे देखभाल-दुरुस्तीचे नाटक नेमके हे दोन्ही विभाग कोणासाठी आणि कशाला करतात असा प्रश्न उपस्थित होत आहे.