Devendra Fadnavis | Vijay Wadettiwar – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘अतिरेक्यांकडे लोकांचा धर्म विचारायला वेळ असतो का?’ असा सवाल करणाऱ्या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
अशा प्रकारची विधाने करून पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. अशा विधानांना मूर्खपणा म्हणावे की काय? हे समजत नाही, असे ते म्हणाले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन जे लोक मृत्युमुखी पडलेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे. आत्ता नातेवाईकांच्या म्हणणे माध्यमांनी जाहीरपणे सांगितले. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अतिरेक्यांनी धर्म विचारून मारले.
त्यामुळे वडेट्टीवारांनी असे विधान करू नये. ते तिथे घटनास्थळी होते का? इथे बसून अशी विधान करणे हे अतिशय वाईट आहे. याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावे? हे मला समजत नाही. माझ्याकडे यासाठी शब्द नाहीत, असे ते म्हणाले.
फडणवीस पुढे म्हणाले, राज्यातील सर्वच पाकिस्तानी नागरिकांची ओळख पटवण्यात यश आले आहे. या प्रकरणी अद्याप आकडा स्पष्ट झाला नाही. पण पोलिस विभाग लवकरच हा आकडा जाहीर करेल.
पण मी स्पष्ट करतो की, जे पाकिस्तानी नागरिक भारतातून बाहेर गेले पाहिजेत, अशा सर्व नागरिकांची ओळख पटवण्यात आली, त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आणि त्यांना बाहेर जाण्याचे निर्देश देण्यात आले.
त्यांचे ट्रॅकिंगही सुरू आहे. त्यांची आकडेवारी लवकर सांगितली जाईल. पण केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीतील कोणताही नागरिक आम्हाला सापडला नाही असे नाही, असेही फडणवीस म्हणाले.