1970 च्या दशकात अत्यंत लोकप्रिय लेखक गोपाल नीलकंठ दांडेकर यांनी “पद्मा’ नावाची अतिशय रसाळ कादंबरी लिहिली. भाषेचा एक वेगळा बाज, बाराव्या शतकातले वातावरण, त्यावेळच्या चालीरीती, गुरू-शिष्य परंपरा असे सारे नानाविध पैलू या कादंबरीत समर्थपणे दिसून येतात. कादंबरीमध्ये मुख्य दोन पात्रे आहेत, कादंबरीची नायिका पद्मा आणि नायक जयदेव!
भारतवर्षात असणाऱ्या चार धामांपैकी “जगन्नाथपुरी’ या धामाच्या परिसरात घडलेल्या कथानकाची पार्श्वभूमी या कादंबरीसाठी दांडेकरांनी निवडली आहे. चमत्कार वाटाव्या अशा प्रकारच्या काही घटना कथानकाच्या ओघात वाचकांसमोर येतात आणि पद्मा-जयदेव ही दोन्ही पात्र अधिकाधिक ठसठशीत होत जातात. देवशर्मा नावाचे सधन गृहस्थ जगन्नाथपुरी शेजारच्या विष्णुपुरी या गावचे स्वामी असतात. हे स्वामीत्व त्यांच्याकडे पाच पिढ्यांपासून आलेले असते. प्रत्येक पिढीमध्ये एकच वंशज उत्तराधिकारी म्हणून शिल्लक राहण्याचा योग त्यांच्या घराण्यात आलेला असतो. ज्या पिढीत निपुत्रिकत्व प्राप्त होईल त्या पिढीपासून विष्णुपुरीचे स्वामित्व तुमच्या घराण्याकडून निघून जाईल, असे भविष्य एका भविष्यवेत्त्याने सांगितलेले असते. देवशर्मांना सध्या त्रेपन्नावे वर्ष लागते आणि अजूनही त्यांना संतानप्राप्ती झालेली नसते. त्यांची पत्नी रेणूका एक आदर्श पत्नी असते. पुत्रप्राप्ती होत नाही हे पाहून ती तत्कालीन पद्धतीनुसार देवशर्म्यांसाठी अंबिका नावाच्या देखण्या मुलीशी त्यांचा द्वितीय विवाह लावून देते तथापि तिलाही काही संतानप्राप्ती होत नाही. अखेरीस देवशर्मांना खूप आग्रहाने तयार करून कमला नामक एका भाबड्या बडबड्या मुलीशी त्यांचा तिसरा विवाह रेणूका लावून देते. एवढे झाले तरीही अपत्य प्राप्तीसाठी अजूनही प्रतिक्षाच असते. त्यामुळे जगन्नाथाच्या दर्शनाला आलेले देवशर्मा अतिशय उदास मनस्थितीत वावरत असतात. त्यादिवशी मंदिरात गेलेले असताना तेथील महंत त्यांना “इच्छित वस्तूचा त्याग करण्याची सिद्धता, हाच ती वस्तू प्राप्त करून घेण्याचा उपाय सांगतात. म्हणजेच होणारे मूल जगन्नाथाच्या चरणी अर्पण करणे हा तो उपाय असतो. रेणूकेला तो उपाय ते सांगतात आणि निपुत्रिकाचा डाग संपविण्याच्या उद्देशाने तीही तो मान्य करते. दुसऱ्या दिवशी सकाळी देवशर्मा भक्तिभावाने मंदिरात जातात आणि भगवान जगन्नाथाला साकडे घालतात. जगन्नाथावरची भक्ती अल्पावधीत फळास येते आणि रेणूकाला दिवस गेल्याची गोड बातमी सगळ्यांच्या कानावर पडते.
यथावकाश रेणूका प्रसुत होते. तिला एक अत्यंत सुंदर कन्यारत्न प्राप्त होते. ही कन्या म्हणजेच या कादंबरीची नायिका पद्मा होय. जिचा जन्म तिच्या त्यागावर आधारलेला आहे. पद्मा तिची आई रेणुकेपेक्षा कमलेच्या अंगावरची जास्त असते. विशिष्ट वयानंतर पद्मेला जगन्नाथाच्या पायावर वाहून द्यायचे आहे, हे जेव्हा कमलेला कळते त्यावेळी ती बंड करून उठते. पण देवशर्मांना तसे करावेच लागणार असते. पद्माचा जन्म आणि पद्माचा त्याग या दोन्ही गोष्टींची ही अटळ सांगड कमलेच्या विचारांपलीकडची असते.
पद्मा दिसायला अत्यंत रेखीव, सुंदर आणि शालीन असते. जगन्नाथाचा प्रसाद असणारी पद्मा जात्याच हुशारही असते. तिला अध्ययनात रुची असते, नटण्याथटण्याचे मात्र तिला अजीर्ण होत असे. तिला शिकवायला येणाऱ्या पंडितांच्या प्रत्येक शब्दाकडे तिचे लक्ष असे. कमलेला ती आई आणि रेणूकेला बाई म्हणत असे. कमला तिला वेगवेगळे कपडे, आभूषणे घालण्याचा आग्रह करी पण तिला ते नकोसे वाटे. पद्माला एक प्रकारची विरक्तीच आलेली होती. जणू काही भविष्यातल्या तिच्या मार्गक्रमणाची ती जणू नांदीच होती. देवध्यानात नेहमीसाठी पद्मा गुंग असे.
पद्माला तेरावे वर्षे सुरू झाले, तेव्हाच कमलेलाही दिवस गेल्याचे शुभवर्तमान समजले. अशातच पद्माला पूरीला सोडण्याचे दिवस जवळ आले होते. भविष्याच्या पोटात काय दडले आहे, याचा अंदाज कोणालाच नव्हता. याच कालखंडात परिसरातील बिंदूबिल्व या गावी असणाऱ्या भोजदेव आणि राधादेवी या दाम्पत्याच्या पोटी जयदेव नावाचा अत्यंत गोंडस पुत्र जन्माला आला होता. या पुत्रास वडिलांनी बारा वर्षांच्या अध्ययनासाठी नवद्वीपास गुरुदेवांकडे ठेवले होते. हा पुत्र अत्यंत प्रतिभावान, घनपाठी, मधुर गायनकला प्राप्त असणारा, बृहस्पतीसारखी वाणी असणारा प्रज्ञावान होता. त्याच्या गुरूंनी भोजदेवांना त्याच्या उज्ज्वल भविष्याविषयीची खात्री दिली होती. बारा वर्षांचे खडतर अध्ययन संपवून जयदेव “साहित्य दिक्पती’ ही पदवी प्राप्त करता झाला. त्याचा वेद-शास्त्र-पुराणांचा प्रचंड अभ्यास झाला. या बारा वर्षांत आईवडिलांच्या भेटीसाठी केवळ तो तीन वेळेसच येतो. या दरम्यान भोजदेव आणि राधादेवी म्हातारे झाले. राधादेवीचे तर दिसणेही खूप कमी झाले.
त्यामुळे जयदेवाचे आता घरी कायमचे झालेले आगमन दोघा वृद्धांसाठी कमालीचे आनंददायी होते. काही दिवस जयदेव गावी राहिला पण आता त्याला जगन्नाथपुरीला जाऊन राहायचे आहे आणि आयुष्यभर संन्यस्तवृत्तीने जगन्नाथाची सेवा करावयाची आहे. त्याला येणारी सारी शास्त्रे विद्यार्थ्यांना शिकवावयाची आहे. मुलाचा हा मानस आईवडिलांसाठी फारसा आनंददायी नसला तरीही मुलाच्या समाधानातच आपले सौख्य मानणारे ते आहेत. त्यामुळे एके दिवशी सकाळी घरातले किडूकमिडूक आवरून बैलगाडीत ठेवून गावाला कायमचा रामराम करीत ते पुरीकडे प्रस्थान करते झाले आहेत. गावकऱ्यांशी त्यांचे अत्यंत प्रेमाचे संबंध असल्याने सगळ्या गावाला त्यांच्या जाण्याचे दु:ख आहे.
जयदेवाला लग्न करावयाचे नाही हा त्याचा संकल्प आईवडिलांना तोडणे शक्य झालेले नाही. पुरीला पोहचल्यावर तेथील एक सद्गृहस्थ आपली गावाबाहेरची जागा कुटी उभारण्यासाठी जयदेवाला देतात आणि अल्पावधीत तेथे निवाऱ्याची सोय होते. जयदेवाच्या बोलण्याकडे आकृष्ट होऊन तेथील काही लोक त्याच्याकडे आपल्या मुलांना व्याकरण, न्याय, वेगवेगळ्या संहिता शिकविण्यासाठी पाठविण्यास प्रारंभ करतात आणि अगदी कमी वेळात जयदेवाला आपली झोपडी अध्यापनासाठी कमी पडू लागते. मग पुरीतील धनिक जयदेवाला एक मोठी पाठशाळा बांधून देतात. दिवसभर ही पाठशाळा विद्यार्थ्यांनी गजबजलेली असे. रात्री मात्र जयदेव आपल्या झोपडीतच मुक्कामास येत असे. दोन वर्षांच्या कालावधीनंतर एका पाठोपाठ एक भोजदेव आणि राधादेवी हे दोघे आपापले देह ठेवतात.
पुरीची कार्तिकी यात्रा म्हणजे एक महामेळाच असे. या यात्रेच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रांतातले पंडित शास्त्रार्थ करण्यासाठी तेथे येत. पाटलीपुत्र नगरीहून पंडित महाप्राण नावाचे एक अहंमन्य अभ्यासकही त्यात येत आणि सगळ्यांना आपल्या उर्मट शैलीने हरवत. परंतु यावर्षी मात्र महाप्राणना तरुण कोवळा जयदेव हरवतो आणि संबंध पुरीवासियांची वाहवा मिळवतो. या सभेमध्ये देवशर्मा, रेणूका, कमला आणि पद्माही आलेल्या असतात. जयदेवाची अमोघ वाणी ऐकून हा परिवार स्तितीम होतो. पद्माला पुरीला सोडवण्यासाठी ते आलेले असतात. त्यांच्या काळजामध्ये घालमेल होत असते. भगवान जगन्नाथ काय मार्ग दाखवतात, याची त्यांना उत्कंठा असते. आणि त्याच रात्री कमलेला स्वप्न पडते, पद्माचा हात जयदेवाच्या हातात दिल्याचे. भगवान जगन्नाथांनी मार्ग दाखवलेला असतो.
दुसऱ्या दिवशी सकाळी हा परिवार जयदेवाच्या कुटीत पोहचतो. कमलेला झालेला दृष्टान्त देवशर्मा जयदेवाला सांगून आम्ही आता पद्मेला सोडून चाललो आहोत, असे सांगतात. पण जयदेवाने लग्न न करण्याचा निश्चय केलेला आहे, हे वर्तमान त्यांना समजते. अर्थात, असे असले तरीही कमला जयदेवाचे म्हणणे मान्य न करता पद्माला तेथेच सोडून निघते आणि शेवटी जयदेवाला पद्माचा स्वीकार करावा लागतो. एका शुभमुहुर्तावर एक अत्यंत सुकोमल, लाघवी, देखण्या वधुवरांचा शुभविवाह पार पडतो आणि देवशर्मांची काळजी दूर होते. दोघे पतीपत्नी एकमेकांच्या प्रगाढ प्रेमात असतात. दिवसभर त्यांचे अध्यापन, अध्ययन, सत्य वाणी, नीतिमूल्य यांच्या सान्निध्यात आचरण सुरू असते. त्याचवेळी जयदेव उत्तमोत्तम काव्यनिर्मितीही करीत असतात. त्यांचे प्रकांड पांडित्य चहूबाजूला चकीत करीत असते. जयदेवाचे काव्य आणि पद्माचे गायन याचा बोलबाला सर्वदूर पसरतो. जगन्नाथाच्या मंदिरातही या दोघांचे स्वर्गीय गायन होऊ लागते.
चार वर्षांचा कालखंड निघून जातो. त्याचवेळी सहा वर्षांनंतर तेथील सम्राट लक्ष्मणसेनांचे आगमन पुरीला होते. त्यांनाही काव्यनिर्मितीचा छंद असतो. पुरीला आल्यावर त्यांच्या कानावर जयदेव-पद्माची कीर्ती जाते आणि आपले काव्य या दोघांनी म्हणावे असा ते आग्रह धरतात. त्याप्रमाणे जयदेव-पद्मा काव्यगायन करतात पण ते महाराजांचे नसून जयदेवाचेच असते. अर्थात महाराज त्याचा राग करीत नाही. त्याचे कारण भगवान जगन्नाथ हेच जयदेवाचे काव्य श्रेष्ठ असल्याचा दृष्टान्त देतात. नंतरच्या काळात जयदेव आणि महाराजांमध्ये अनन्य मैत्रभाव निर्माण होतो. महाराजांची पत्नी मांडवीदेवी यांना मात्र पद्मेचे अप्रतिम सौंदर्य सलत असते. पद्माशी त्या वरवर चांगले बोलत असल्या तरी मनात मात्र त्यांना तिच्याविषयी वैषम्यभाव असतो. एक दिवस गप्पा मारता मारता त्या तिच्या पतिव्रत्याविषयीची संकल्पना विचारतात. तेव्हा पद्मा म्हणते, “जयदेवांच्या नसण्याच्या बातमीनेही माझे प्राण देहातून निघून जातील.’ मांडवीदेवींना तिची परीक्षा घेण्याची हुक्की येते.
एक दिवस महाराज आणि जयदेव शिकारीसाठी जातात आणि मांडवीदेवींना तशी संधी मिळते. त्या एका सेवकास जयदेवाच्या वस्रांसारखी वस्रे हातात घेऊन येण्यास सांगून जयदेवांची वाघाने शिकार केल्याचे सांगण्याची आज्ञा करतात. त्याप्रमाणे सगळा बनाव पद्मासमोर घडून येतो. जयदेवाच्या निधनाची बातमी ऐकताच पद्मा कोसळते आणि प्राणत्याग करते. आपल्या चेष्टेचा एवढा भीषण परिणाम होईल याचा अंदाज मांडवीदेवींना अजिबातच नसतो.
तेवढ्यात जयदेव शिकारीहून परत येतो तेव्हा निष्प्राण पद्माचा देह त्याच्या दृष्टीस पडतो. दु:खातिरेकाने तो सैरभैर होतो. त्याचक्षणी पद्माला उचलून तो जगन्नाथाच्या मंदिरात येतो आणि आपले सुप्रसिद्ध गायन सुरू करतो. ईश्वराची करुणा भाकणारे ते गायन एवढ्या उच्च कोटीचे होते की काही वेळातच पद्माच्या निष्प्राण देहात प्राण संचारतो आणि ती उठून बसते. हा चमत्कार पाहून संबंध पुरीवासीय भगवान जगन्नाथाचा, महाकवी जयदेवाचा आणि प्रतिव्रता पद्माचा जयजयकार करतात. येथे ही कादंबरी संपते. पद्मा आणि जयदेवाचे हे अतिशय भावगर्भ आणि मनाला स्पर्श करणारे कथानक रसाळ पद्धतीने गोनीदांनी “पद्मा’ या कादंबरीत उलगडून दाखविले आहे. त्यामुळे कोणत्याही वयोगटातल्या वाचकाला ही कादंबरी आवडल्याशिवाय राहाणार नाही.
पुस्तकातील माणसं
डॉ. विनोद गोरवाडकर