अवसरी- आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात भात पिकाची लागवड होऊन पंधरवड्यापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. सध्या भात पिके जोमात आली आहेत. त्यामुळे पिकांना खते देण्याच्या कामाला वेग आला आहे. यावर्षी भाताचे उत्पादन चांगले येणार असल्यामुळे शेतकरी आनंदित आहेत.
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात आदिवासी बांधवांची संख्या जास्त आहे. आदिवासी लोकांचे पावसाळ्यातील प्रमुख पीक म्हणजे भात. गेल्या पंधरा दिवसांत आदिवासी भागात जोरदार पाऊस पडला होता. पावसाला सुरुवात झाल्यानंतर आदिवासी भागातील आहुपे, तिरपाड, कोंढरे, कुशिरे, महाळूनगे, माळीण अशा अनेक भागात भात लागवड सुरू झाली आहे. त्यानंतर संततधार पाऊस सुरू झाल्याने भात खाचरे भरून वाहू लागली. गेले दोन-तीन दिवसांपासून अधून-मधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शेतकरी भात पिकांना खते देत असल्याचे चित्र दिसून येत आहे.