मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संपूर्ण राज्यात लॉकडाऊनचा लागू करण्याबाबतचा इशारा दिला आहे.
लोकांनी नियमांचं पालन केलं नाही तर पुढच्या दोन दिवसात लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील सरकारवर टीका करणाऱ्या अनेकांचा समाचार घेतला.
यातच आता विरोधक आणि राज्य सरकारमध्ये हमरीतुमरी सुरु झाली आहे. महाराष्ट्र एकमेव राज्य आहे ज्या राज्याने कोरोना काळात लॉकडाऊन केल्यानंतर नागरिकांना मदत केलेली नाही, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच कालचे मुख्यमंत्र्यांनी केलेले भाषण कशासाठी होते हेच अजून कळले नाही असा खोचक टोलादेखील लगावला आहे. तर या भाषणावर आता आमदार गोपीचंद पडळकर यांनी जळजळीत टीका केली आहे.
काय म्हणाले गोपीचंद पडळकर
”दरवेळेला जनतेला गृहीत धरुन मनमानी कारभार रेटायचा बंद करा. बरं यातही सगळं लोकांनीच करावं, जनतेनं रोखावं किंवा जबाबदारीनं वागावं, तर मग तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाइव्ह करायला मुख्यमंत्री झालात का? जनतेला रस्त्यावर उतरून दाखवा म्हणणाऱ्यांनी आधी खुर्चीवरून उतरून दाखवावं.’
ते पुढे म्हणाले,’काल रात्रीचं फेसबुक लाईव्ह नेमकं कशासाठी होतं? जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम सरकारनं करु नये. इथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे आणि तुम्ही लॉकडाऊन- लॉकडाऊन हा काय खेळ लावलाय? वर्षभरात काय केलं तुम्ही? ‘