नवी दिल्ली – बिहार निवडणुकीपेक्षा विविध राज्यांमध्ये ज्या पोटनिवडणुका झाल्या, त्या पोटनिवडणुकांचे निकाल मला आधिक चिंता निर्माण करणारे वाटतात. मध्यप्रदेश, कर्नाटक, उत्तरप्रदेश, गुजरात या राज्यातील पोटनिवडणुकांमध्ये कॉंग्रेसला मोठे अपयश आले आहे.
यातून त्या राज्यांमध्ये कॉंग्रेस संघटनात्मक दृष्ट्या कमकुवत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे अशी कबुली ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी चिदंबरम यांनी दिली आहे.
एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही कबुली दिली आहे. या विषयी पक्षात आत्म परिक्षण होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपुर्वीच कपिल सिब्बल यांनीही पक्षाच्या नेतृत्वाला असाच सल्ला दिला होता. त्या पाठोपाठ आता चिदंबरम यांनीही पक्षाला जाहीररित्या हा सल्ला दिला आहे. बिहार मध्येही कॉंग्रेसने क्षमतेपेक्षा जास्त जागा लढवल्याचे त्यांनी मान्य केले.
ते म्हणाले की बिहार मध्ये कॉंग्रेसने 45 जागा लढवायला हव्या होत्या. बिहार मध्ये ज्या 25 मतदार संघांत भाजपने गेली 20 वर्ष सतत विजय मिळवला आहे, त्या मतदार संघात कॉंग्रेसला निवडणूक लढवायला लागली. त्याचा मोठा फटका कॉंग्रेसला बसला असे ते म्हणाले.
मला बिहार पेक्षा अन्य राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल अधिक चिंतीत करतात असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की त्या राज्यांमध्ये कॉंग्रेसचे संघटनात्मक अस्तित्वच शिल्लक राहिलेले नाही किंवा ते खूपच कमकुवत झाले आहे असे दिसून आले आहे.
एखादा पक्ष संघटनात्मकदृष्ट्या स्थानिक पातळीवर मजबूत असला तर तोही चांगले यश मिळवू शकतो हे एमआयएम, मार्क्सवादी कम्युनिस्ट, आदि पक्षांनी बिहार मध्ये दाखवून दिले आहे असेही त्यांनी निर्दशनाला आणून दिले.