नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळेच कोविडच्या दुसऱ्या लाटेत देशात मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन टंचाई निर्माण झाली आणि अनेक रूग्णांचा त्यामुळे मृत्यू झाला आहे ही वस्तुस्थिती आहे असा दावा दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारने ऑक्सिजन वितरण व्यवस्थेत अचानक काहीं बदल केले त्यामुळे 23 एप्रिल नंतर देशाच्या अनेक भागात कमालीची ऑक्सिजन टंचाई निर्माण झाली.
ते म्हणाले की ऑक्सिजन अभावी दिल्लीत ज्या रूग्णांचा मृत्यू झाला त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही दिल्ली सरकारतर्फे एक पॅनेल स्थापन केले होते पण केंद्राने आम्हाला ते पॅनेल स्थापन करू दिले नाही, आजही केंद्राने आम्हाला त्यासाठी अनुमती दिली तर आम्ही या प्रकाराचा नेमका चौकशी अहवाल लोकांपुढे ठेऊ शकतो असे ते म्हणाले.
देशात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाहीं असा निर्लज्ज दावा केंद्र सरकारने संसदेत केला आहे असे ते म्हणाले. सिसोदिया म्हणाले की देशात 15 एप्रिल ते 5 मे या काळात देशात सर्वत्र ऑक्सिजनची अभुतपुर्व टंचाई निर्माण झाली होती.
आम्ही दिल्ली सरकारने याच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केली होती पण केंद्र सरकारने राज्यपालांमार्फत अशी समिती स्थापन करण्यास आम्हाला बंदी घातली. आपला यातील गैरकारभार उघडकीला येईल म्हणूनच केंद्राने आम्हाला ही चौकशी समिती स्थापन करू दिली नाही असा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान दिल्लीच्या आरोग्य मंत्र्यांनीही केंद्राच्या दाव्याची खिल्ली उडवली असून त्यांनी म्हटले आहे की अजून काहीं दिवस थांबा, देशात करोना आलाच नव्हता असा दावाही केंद्र सरकार करू शकते असे त्यांनी म्हटले आहे.