पिंपरी – विभागीय आयुक्त कार्यालयाच्या करोनाबाबत माहिती देणाऱ्या संकेतस्थळावर महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात 220 ऑक्सिजन बेड उपलब्ध असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, एका ज्येष्ठ महिलेला साडेसहा तासांच्या प्रयत्नानंतर देखील बेड मिळू शकला नाही. पर्यायाने, महिलेला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे लागले.
मोहननगर येथील ज्येष्ठ महिला रुग्णाला गुरुवारी (दि. 16) सकाळी 8 वाजता श्वास घेण्यासाठी अचानक त्रास होऊ लागला. वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजन बेड उपलब्ध व्हावे, यासाठी नातेवाइकांनी प्रयत्न सुरू केले. माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी देखील रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांच्याशी संपर्क साधला. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. आयुक्त श्रावण हर्डीकर यांना संपर्क केला. रुग्णाला वायसीएममध्ये घेऊन जावे, असे आयुक्तांनी सांगितले. मात्र, बेड उपलब्धेबाबत माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधूनही फोन न उचलल्याने समजू शकली नाही.
रुग्णाच्या नातेवाईकांनी पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील काही खासगी रुग्णालयांमध्ये संपर्क साधून बेड उपलब्ध आहेत का, याची माहिती घेतली. मात्र, वेटिंगवर असल्याचे त्यांना सांगण्यात आले. दुपारी 1 ते 1:30 च्या सुमारास चिंचवड येथील खासगी रुग्णालयात त्यांना तात्पुरत्या स्वरूपात बेड मिळाला. बऱ्याच प्रयत्नानंतर सायंकाळी 6:15 वाजता पिंपरीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
वायसीएम रुग्णालयात सगळे ऑक्सिजन बेड भरलेले आहेत. मात्र, ज्या रुग्णाला ऑक्सिजनची गरज नसेल त्यांच्याऐवजी तुमच्या रुग्णाला ऑक्सिजन लावण्यात येईल, असे सायंकाळी 6:30 वाजता डॉ. वाबळे यांनी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या संकेतस्थळावर वायसीएम रुग्णालयात ऑक्सिजनची सुविधा असणारे 220 आयसोलेशन बेड रिक्त असल्याचे गुरुवारी दाखविण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात बेड उपलब्ध नव्हते.
महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील 400 ऑक्सिजन बेड आहेत. ते सर्वच सध्या हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजनची गरज नसते त्यांचा ऑक्सिजन काढून अन्य रुग्णांना देण्याची व्यवस्था केली जाते. बेड उपलब्ध नसल्यास खासगी रुग्णालयात रुग्णाला नेण्यासाठी सांगितले जाते.
– श्रावण हर्डीकर, आयुक्त.
रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडचा खूप तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. रुग्णांना ठेवण्यासाठी सर्व शाळा, मंगल कार्यालये, मोठ्या इमारती, काही हॉटेल्स ताब्यात घ्यायला हवे.
– मारुती भापकर, माजी नगरसेवक.