सातारा – आंदोलनाला बसलेले हे शेतकरी नाहीतच, शिवाय त्यांना पाठिंबा देणारी घुबडं आहेत, कारण त्यांना कायम अंधारच राहावा, असे वाटत असल्याची खरमरीत टीका रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आ. सदाभाऊ खोत यांनी सातारा येथे पत्रकार परिषदेत केली.
सदाभाऊ खोत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सतत शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहे. तीन कृषी विधेयके शेतकऱ्यांचे आर्थिक सबलीकरण करणारी आहेत. मात्र, देशातील काही शेतकरी या विधेयकाला विरोध करत नवी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. त्या आंदोलकांना काही विरोधक पाठिंबा देत असून हा सर्व प्रकार चुकीचा आहे.
मोदी देशातील शेतकरी सक्षम करायला निघाले आहेत. मात्र, काही मंडळी आंदोलनाच्या नावाखाली त्याला विरोध करत आहेत. आता तर जो तो उठतोय आणि कृषी कायद्यांना विरोध करत आहे. त्याला काहीजण पाठिंबा देत आहेत, असे खोत म्हणाले.