मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात शिवसेना व भाजपामध्ये आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी अटीतटीची स्पर्धा सुरू असल्याचे दिसत आहे. जागा मिळवण्यासाठी सर्व पक्ष जुळवाजुळव करत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे यात लक्ष घालत आहेत. दरम्यान एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी याबाबत भाष्य केले आहे.
भाजपला हरवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येण्याची चिन्हे असताना आता असुदुद्दीन ओवेसी यांनी,“महाविकास आघाडीतर्फे कोणीही माझ्यासोबत किंवा आमच्या आमदारासोबत संपर्क साधलेला नाही. त्यामुळे आम्ही वाट पाहू. जर महाविकास आघाडीला आमची गरज असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. गरज नसेल तर ठीक आहे आम्ही आमचा निर्णय घेऊ. आम्ही आमच्या आमदारांसोबत बोलत आहोत आणि एक किंवा दोन दिवसांत याबाबत निर्णय घेऊ,” असे असदुद्दीन ओवेसी म्हणाले.
दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना व मित्र पक्षांच्या आमदारांची बैठक घेत कशाचीही भीती न बाळगता शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षां या सरकारी निवासस्थानी शिवसेनेच्या व मित्र पक्षांच्याआमदारांशी संवाद साधला.