हैद्राबाद – सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज, सुधारित नागरिकत्व कायद्यावरून काही लोक मुस्लिम बांधवांची दिशाभूल करत असल्याचा दावा केला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दसरा मेळाव्यामध्ये बोलत होते.
सरसंघचालकांच्या याच वक्तव्यावरुन आता एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. ओवैसी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना, जर हे कायदे मुस्लिमांबाबत नसतील तर यातील सर्व धर्माचे संदर्भ काढून टाकणार का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
काय म्हणाले सरसंघचालक?
सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात झालेल्या आंदोलनांमुळे देशात तणावाचं वातावरण निर्माण झालं. या कायद्याबाबत अधिक चर्चा होण्यापूर्वीच यावर्षी सर्व लक्ष कोरोनावर केंद्रित झालं. यामुळे प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवण्याचं कारस्थान हे त्यांच्या डोक्यातच राहील, कोरोनामुळे इतर सर्व मुद्दे दुर्लक्षित झाले.
CAA doesn’t oppose any specific religious community. Yet few protested against this law & misguided our Muslim brothers by their false propaganda that this law was brought for restricting the Muslim population. So, due to this, there were further protests: RSS Chief Mohan Bhagwat https://t.co/C01b748j9C pic.twitter.com/pctEtIy1ut
— ANI (@ANI) October 25, 2020
सुधारित नागरिकत्व कायदा कोण्या एका धार्मिक समुदायाविरोधात नाही. असं असलं तरीही काहींनी याविरोधी आंदोलनं केली. हा कायदा मुस्लिमांच्या संख्येवर अंकुश ठेवण्यासाठी आणला गेलाय असा अपप्रचार करत आपल्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली. यामुळेच पुढील आंदोलनं झाली.
ओवैसींचा निशाणा
दरम्यान, सरसंघचालकांच्या या वक्तव्यावर निशाणा साधत असदुद्दीन ओवैसी यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. ते लिहतात, “आमची दिशाभूल करायला आम्ही काय लहान पोरं नाही. सीएए व एनआरसीद्वारे काय साध्य करायचं आहे याबाबत भाजप अवाक्षरही काढत नाही. जर हे कायदे मुस्लिमविरोधी नसतील तर यातील सर्व धर्माबाबतचे संदर्भ काढून टाका. जोपर्यंत आम्हाला भारतीय असल्याचं सिद्ध करायला लावणारे कायदे अस्तित्वात आहेत आम्ही आंदोलने करतच राहू, हे लक्षात घ्या.
We’re not kids to be ‘misguided’. BJP didn’t mince words about what CAA+NRC were meant to do. If it’s not about Muslims, just remove all references to religion from the law? Know this: we’ll protest again & again till there are laws that require us to prove our Indianness…[1] https://t.co/uccZ8JTjsi
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) October 25, 2020
आम्ही अशा सर्व कायद्यांना विरोध करू ज्यामध्ये धर्मावर आधारित नागरिकत्व देण्याची तरतूद असेल. याप्रसंगी मला काँग्रेस व राजद व त्यांच्यासारख्या इतर पक्षांना हे आवर्जून सांगायचंय की, आंदोलनांवेळी तुम्ही बाळगलेले मौन कधीही विसरलं जाणार नाही. जेव्हा भाजप नेते सीमांचलच्या लोकांना ‘घुसखोर’ म्हणत होते तेव्हा आरजेडी-काँग्रेसने एकदाही तोंड उघडले नाही.