सोलापूर – कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणायचे एमआयएमला मत देऊ नका शिवसेना आणि भाजपला फायदा होईल. राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने “एमआयएम’ला भाजपची “बी टीम’ म्हटले होते. “एमआयएम’ला मत देऊ नका. ते भाजपला मत देण्यासारखे आहे, असे लोकसभेत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणायचे. मात्र जेंव्हा सत्ता स्थापना करावी लागली तेंव्हा हेच लोक एकत्र आले आणि मुसलमानांना धोका दिला.
शिवसेना सेक्युलर पक्ष नाही. शिवसेना भाजप सारखेच जातीयवादी आहे. शिवसेना सेक्युलर आहे की नाही, याचे उत्तर शरद पवार आणि राहुल गांधींनी द्यावे. आपले घोटाळे व परिवार वाचविण्यासाठी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर सरकार स्थापन केल्याची टीकाही यावेळी खासदार ओवेसी यांनी केली.
मराठा समाजाच्या तुलनेत सर्वच बाबतीत अत्यल्प असलेल्या मुस्लीम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ,असे सांगत ओवेसी यांनी सोलापुरातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला.
मराठा समाजाकडे भरपूर काही आहे. त्या तुलनेत मुस्लिम समाजाकडे काहीच नाही. याबाबतची आकडेवारी दर्शवत मुस्लिम समाजाच्या आरक्षणाची मागणी ओवेसी यांनी यावेळी बोलताना केली. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या कारभारावरही त्यांनी संताप व्यक्त केला. या सरकारवर विश्वास ठेवू नका.
आता आपल्याला बदलावे लागणार आहे. या सत्ताधाऱ्यांना ओळखावे लागणार आहे. आपला भ्रष्टाचार लपविण्यासाठी सेक्युलरिझमचे हत्यार काढण्यात आले आहे. मुस्लिमांना आमिष दाखवण्यात येते. आमच्या भावनांचा आदर ठेवला जात नाही.
11 डिसेंबरला चलो मुंबई !
27 नोव्हेंबरची परवानगी नाकारली असली तरी 11 डिसेंबरला मात्र मुंबईत मुस्लीम आरक्षण तसेच वक्फच्या जमिनी वाचवण्यासाठी जाणार आहोत.पूर्वी करोनाचे कारण देत परवानगी नाकारली होती.आता मात्र मुंबईत धडकणार असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले.
धनगर समाज आणि मराठा समाजाला आरक्षण द्या पण कोर्टाच्या आदेशानुसार मुस्लिम समाजालाही आरक्षण मिळाले पाहिजे. याशिवाय व वक्फची जमीन हडप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.मुस्लिम समाजाला आरक्षण मिळण्यासाठी एमआयएमचे कार्यकर्ते गाड्यांना कोणत्याही पक्षाचा झेंडा न लावता तिरंगा झेंडा लावून मुंबईत मोर्चा काढणार असल्याचे ही खासदार जलील म्हणाले.