नवी दिल्ली – देशातील करोना संक्रमणाचा धोका अधिकाधिक गंभीर होंत चालल्याची लक्षणे आहेत. एकाच दिवसात देशभरात करोनाग्रस्तांचा आकडा 90 हजारांच्याही पुढे गेल्याचा नवीन विक्रम नोंदवला गेला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी जारी केलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशातील करोनाग्रस्तांची संख्या तब्बल 90 हजार 632 ने वाढली आहे. त्यामुळे देशातील एकूण करोनाग्रस्तांचा आकडा आता 41 लाख 13 हजार 811 इतका झाला आहे. मृतांचा आकडाही 70 हजार 626 इतका झाला आहे.
दरम्यान रूग्ण बरे होण्याचाही विक्रम गेल्या 24 तासांतच नोंदवला गेला असून या कालावधीत एकूण 73 हजार 642 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 31 लाखांच्याही पुढे गेली आहे.
देशात सध्या अनलॉकिंगची प्रक्रिया सुरू आहे. जसजसे व्यवहार सुरळीत होंत आहेत तसतशी करोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने त्यावर आता कसे नियंत्रण आणायचे ही केंद्र व राज्य सरकारांची एक डोकेदुखी बनली आहे. रिकव्हरीचा दर 77.32 टक्के इतका असला तरी बाधितांचा आकडाही काही कमी होताना दिसत नसल्याने ठिकठिकाणचे प्रशासन हतबल होताना दिसत आहे.