श्रीनगर : उत्तर काश्मिरच्या सीमावर्ती क्षेत्रातील गुरेझ क्षेत्रातील खानझल्वान येथे झालेल्या हिमस्खलनानंतर तेथील 200 भारतीय जवनांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. गुरेझ, बंदीपूर, खुपवाडा, नौगाव आणि बारामुला भागात गेल्या 48 तासांत तुफानी बर्फवृष्टी होत आहे. या भागात लष्कर मोठ्या संख्यने तैनात आहे.
सियाचेनमध्ये तापमाण उणे 57 अंश सेल्सियस नोंदवले आहे. गेल्या 48 तासांत लष्कराच्या ठाण्याजवळ हिमस्खलनाच्या 32 घटना घडल्या आहेत. मात्र याबाबत वेळीच सावधानतेचा इशारा दिल्याने मोठी जिवित आणि वित्त हानी टाळण्यात यश आले, असे लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले.
खानझल्वानमध्ये जवानांना सुरक्षित स्थळी हलवले. तसेव तंगधर क्षेत्रातही हिमस्खलनाखाली सापडलेल्या सात जवानांना सतर्क बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले. गुलमर्ग येथेही लष्करी जवानांच्या निवाऱ्यावर हिमस्खलन झाले. तेथूनही जवानांना व्यवस्थितपणे बाहेर काढले.
नौगाव भागात सीमा सुरक्षा दलाच्या चार जवानंना हिमस्खलनातून बाहेर काढले. मात्र त्यातील एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मच्छील भागात आणखी एक हिमकडा कोसळण्याची घटना घडली. त्यात पाच जवान सापडले. त्यातील चार जणांची बचाव पथकाने सुटका केली. या चार पैकी एका जवानाची प्रकृती स्थीर असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. तर अन्य दोघे हवामानामुळे उपचारांना प्रतिसाद देत नाही आहेत. अन्य एका जवानाचा शोध शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत सुरू होता, असे लष्कराच्या प्रवक्त्याने सांगितले.