नवी दिल्ली – देशात अवघ्या महिनाभरात 1 कोटी करोनाविषयक चाचण्या झाल्या. त्यामुळे चाचण्यांच्या संख्येने आता 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
करोना संकट घोंघावू लागले त्यावेळी देशात करोनाविषयक चाचण्या घेणारी केवळ 1 प्रयोगशाळा होती. त्यानंतर वेगाने प्रयोगशाळांची संख्या वाढवण्यात आली. त्यामुळे सध्या देशात 1 हजार 348 प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्यामुळे चाचण्यांच्या प्रमाणातही लक्षणीय वाढ झाली आहे.
मागील काही दिवसांपासून देशभरात एकाच दिवसात 4 लाखांच्या आसपास चाचण्या होत आहेत. देशातील चाचण्यांच्या संख्येने 6 जुलैला 1 कोटीचा टप्पा ओलांडला. त्यानंतर तितक्याच चाचण्या होण्यास महिनाभरापेक्षाही कमी कालावधी लागला.
दरम्यान, देशात रविवार सकाळपासून 24 तासांत 52 हजार 972 नवे करोनाबाधित आढळले. त्यामुळे बाधितांची संख्या 18 लाख 50 हजारांच्या आसपास पोहचली आहे. देशात सलग पाचव्या दिवशी 50 हजारांहून अधिक बाधितांची भर पडली. आणखी 771 बाधित दगावल्याने देशातील करोनाबळींची संख्या 39 हजारांच्या घरात पोहचली आहे.
बाधित आणि बळींची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्यांचे प्रमाणही दिलासादायी आहे. देशात एकाच दिवशी 40 हजारांहून अधिक बाधित करोनामुक्त झाले. त्यामुळे देशातील करोना संसर्ग झालेले जवळपास 12 लाख रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. ते प्रमाण 65.77 टक्के इतके आहे.