कर्जत – कर्जत शहरात कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव नसताना व काल झालेला प्रकार हा दोन तरुणामधील भांडणातून घडलेला असताना त्यास बाहेरच्या शक्ती जातीय तेढ निर्माण करणारी परिस्थिती निर्माण करत असून कर्जत शहरातील नागरिक हे खपवून घेणार नाहीत, कर्जत शहरातील वाद समोपचाराने मिटविण्यासाठी आम्ही सक्षम आहोत बाहेरच्यांनी यात लक्ष घालून येथील वातावरण बिघडवू नये, असे आवाहन कर्जत नगर पंचायत मध्ये झालेल्या सर्व समावेशक व्यापारी, राजकीय पक्ष, पदाधिकारी, व नागरिकांच्या बैठकीत करण्यात आले.
कर्जत ही ग्रामदैवत संत श्री गोदड महाराजाची भूमी आहे, आता पर्यत कधीही जातीय वाद येथे झालेला नसताना दोन तरुणामधील भांडणाचा संदर्भ असलेल्या घटनेला जाणून बुजून जातीय रंग दिला जात असून या मुळे कर्जतचे खूप मोठे नुकसान होणार आहे, कर्जत मधील या घटनेला वेगळे रूप दिले जात असून ते योग्य नाही, शहरात कोणतीही घटना घडली की त्यासाठी कर्जत बंद करणे योग्य नाही, काल कर्जत शहरात जो अचानक बंद पुकारला तो व्यापाऱ्यांना मान्य नाही, जो वाद झाला तो मर्यादित कुटूंबामध्ये झालेला होता हे सर्वाना माहीत असताना अचानक पुकारलेल्या बंद मुळे अनेक व्यवसाईकांचे मोठे नुकसान झाल्याचे व्यापारी असो. चे सचिव बिभीषण खोसे यांनी निदर्शनास आणून दिले.