हद्दीबाहेरील 671 रुग्णांचा पिंपरी चिंचवडमध्ये मृत्यू
133 रुग्णांवर उपचार सुरू : 7 हजार 858 रुग्णांची नोंद
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयाव्यतिरिक्त अनेक खासगी मोठे रुग्णालये आहेत. त्यामुळे राज्याच्या काना-कोपऱ्यातून रुग्ण उपचारासाठी शहरामध्ये दाखल होत असतात. कोविडच्या काळातही जिल्ह्यातील ग्रामीण भाग व इतर जिल्ह्यातून 7 हजार 858 करोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यामधील 7 हजार 54 रुग्ण बरे झाले आहेत. तर तब्बल 671 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. एकूण रुग्णांपैकी शहराबाहेरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे तब्बल 8.53 टक्के आहे.
सद्यस्थितीत महापालिकेच्या वायसीएम, ऑटो कल्स्टर, जम्बो कोविड सेंटर आणि खासगी रुग्णालयांमध्ये शहराबाहेरील 133 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर शहरातील 1045 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरामध्ये आतापर्यंत 92 हजार 551 जणांना करोनाची लागण झाली. तर 1638 जणांचा मृत्यू झाला. एकूण रुग्णांपैकी शहरातील मृत्यूचे प्रमाण 1.76 टक्के आहे. तर शहराबाहेरील परजिल्ह्यातील एकूण 7 हजार 858 रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णांपैकी बाहेरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे तब्बल 8.53 टक्के आहे.
बाहेरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. बाहेरील रुग्ण उपचारासाठी खूप उशीर दाखल होत असल्याने मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ग्रामीण भागात अद्यापही अत्यावश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने परिस्थिती गंभीर झाल्यानंतर रुग्णांना पिंपरी-चिंचवड येथे आणले जाते. निदान आणि उपचारात झालेल्या उशिरामुळे रुग्णाची परिस्थिती गंभीर होते. रुग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफला शर्थीचे प्रयत्न करावे लागतात. अशाच प्रयत्नांनी आतापर्यंत हद्दीबाहेरील सात हजाराहून अधिक रुग्णांना डॉक्टरांनी बरे केले आहे. तर 671 रुग्णांना वाचविण्यात मात्र अपयश आले.
अनेक रुग्णांनी गावातील रुग्णालयात अनेक दिवस उपचार घेतले. मात्र त्यानंतर रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांना शहरातील रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यामध्ये बाधित रुग्णांचे 10 ते 12 दिवस उलटून गेलेले असतात. त्याचा परिणाम रुग्णाच्या आरोग्यावर झाला. परिणामी शहरातील रुग्णालयात दाखल केल्यानंतर ते रुग्ण उपचाराला प्रतिसाद देत नाहीत. त्यामुळे शहराबाहेरील रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त असल्याचे वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी सांगितले.
सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक मृत्यू
सप्टेंबर महिन्यामध्ये शहराबाहेरील सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला. या एका महिन्याच्या काळात तब्बल 303 रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. या महिन्यामध्ये एकूण रुग्णांच्या प्रमाणात मृत्यूचे प्रमाण 9.11 टक्के होते. एप्रिलमध्ये 2, मे महिन्यात 12, जून महिन्यात 18, जुलै महिन्यात 56, ऑगस्ट महिन्यात 100, ऑक्टोबर महिन्यात 143, नोव्हेंबर महिन्यात 37 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.