नवी दिल्ली – कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानने बेकायदेशीरपणे आणि बनावट पुराव्यांच्या आधारे ताब्यात ठेवले आहे. त्यामुळे पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांची त्वरित सुटका करायला पाहिजे आणि त्यांना भारताच्या स्वाधीन करायला पाहिजे, अशी मागणी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी केली आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निकालासंदर्भात राज्यसभेमध्ये निवेदन करताना त्यांनी ही मागणी केली. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल म्हणजे केवळ भारतीय बाजूचे समर्थनच नाही, तर ज्यांचा कायद्यावर विश्वास आहे, त्यासर्वांचाच विजय आहे, असे जयशंकर म्हणाले.
कायद्यानुसारच कारवाई होणार- इम्रान खान
कुलभूषण जाधव यांचे प्रकरण कायद्यानुसारच चालवले जाईल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीही म्हटले आहे. भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमध्ये हेरगिरी आणि दहशतवादाच्या आरोपाखाली सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दाद मागितली होती. त्यावरच्या निकालामध्ये पाकिस्तानने फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा आणि जाधव यांना दूतावासाशी संपर्क साधू द्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल रद्द करावा. त्यांची सुटका करावी आणि सुखरूपपणे भारतात येऊ द्यावे या भारताच्या मागण्या मात्र या न्यायालयाने नामंजूर केल्या आहेत. त्यावर इम्रान खान यांनी आनंद व्यक्त केला आहे. जाधव हे पाकिस्तानातील कायद्यानुसार दोषी आहेत. त्यांच्यावर कायद्यानुसारच कारवई केली जाईल, असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्याप्रकरणामध्ये दिलेला निकाल म्हणजे भारताच्या बाजूचे पूर्ण समर्थनच आहे. या निकालाची अंमलबजावणी करणे हे आता पाकिस्तानला बंधनकारक बनले आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल म्हणजे पाकिस्तानचा विजय असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. मात्र जनतेशी खोटे बोलण्याची नामुष्कीची वेळ पाकिस्तानवर आल्याचेही रवीश कुमार म्हणाले.