नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा मिळवल्यानंतर जागतिक पातळीवर एकच गोंधळ उडाला आहे. त्यातच तालिबानच्या अत्याचारातुन मुक्त होण्यासाठी अफगाणी नागरिक धडपड करत आहे. त्यातच भारतात देखील अफगाण नागरिक दाखल झाले आहेत. मात्र यांच्या सोबत देशात करोनाचा संसर्ग झालेले नागरिक देखील देशात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
अफगाणिस्तानातून मंगळवारी भारतात दाखल झालेल्या ७८ जणांपैकी १६ जण करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून त्या सर्व ७८ जणांना विलगीकरणात ठेवले गेले आहे. संसर्ग झालेल्यांमध्ये तीन ग्रंथींचा देखील समावेश आहे.
जे काबूलहून सोबत पवित्र श्री गुरु ग्रंथ साहिबचे तीन सरूप घेऊन आले होते. मंगळवारी सकाळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी, परराष्ट्र राज्यमंत्री वी मुरलीधरन आणि भाजपा नेते आरपी सिंह यांनी विमानतळावर गुरु ग्रंथ साहिबचे सरुप घेत. यावेळी हे ग्रंथ डोक्यावर घेऊन ते दिल्ली विमानतळावरून बाहेर आले होते.
वायु सेनेच्या एका विशेष विमानाने सोमवारी काबूलहून ताजिकिस्तानच्या दुशांबेसाठी उड्डाण घेतले होते. २५ भारतीय नागरिकांसह ७८ प्रवशांना घेऊन, हे विमान मंगळवारी सकाळी दुशांबेहून दिल्लीत दाखल झाले होते.
केंद्रीयमंत्री हरदीप पुरी यांनी मंगळवारी सांगितले की, अफगाणिस्तानमधून आतापर्यंत २८८ भारतीय नागरिकांसह ६२६ जणांना बाहेर काढण्यात आलं आहे. त्यांनी हे देखील सांगितलं की, त्यापैकी ७७ अफगाण शीख होते. अफगाणिस्तानमधून बाहेर काढण्यात आलेल्या भारतीय नागरिकांच्या संख्येत भारतीय दूतावासात काम करणाऱ्या लोकांचा समावेश नाही.