नगर – राज्य निवडणूक आयोगाने घोषित केल्यानुसार जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी गावकर्यांच्या एकीमुळे जिल्ह्यातील 46 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तसेच 721 ग्रामपंचायत सदस्यपदासाठी 13 हजार 194 उमेदवर नशीब आजमावत आहेत.
जून ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपणार्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. या निवडणुका करोनामुळे लांबणीवर पडल्या होत्या. यात जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. येत्या 15 जानेवारीस मतदान प्रक्रिया संपन्न होणार असून, मतमोजणी 18 जानेवारीस होणार आहे. या निवडणुकीसाठीचे काटेकोर नियोजन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या निर्देशात करण्यात आले आहे.
सदस्यपदासाठी एकूण 23 हजार 801 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. सोमवारी (दि.4) अर्ज माघारीची अंतिम मुदत होती. यावेळी 9 हजार 10 जणांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात 13 हजार 194 उमेदवार उतरले आहेत.
येत्या 15 जानेवारीला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तत्पूर्वी 30 डिसेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत 23 हजार 803 अर्ज दाखल झाले होते. दाखल अर्जांची 31 डिसेंबरला छानणी झाली. त्यात 619 अर्ज अवैध ठरले होते, तर 23 हजार 139 वैध ठरले होते. सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी 9 हजार 10 जणांनी अर्ज माघारी घेतले. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, आता पुढील 10 दिवस निवडणूक असणार्या गावात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. आरोप-प्रत्यारोप, सभा, नेत्यांच्या प्रचार फेर्यांमुळे गावागावांतील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे.
आदर्शगावांतच निवडणुकीची रणधुमाळी
ग्रामपंचायत निवडणुकीत आजी-माजी मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, ते आपापल्या मतदारसंघात ग्रामपंचायती बिनविरोध करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, त्यात काही अंशी त्यांना यश आले आहे. त्यामुळे 767 पैकी फक्त 46 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. यापूर्वी हिवरेबाजार, राळेगणसिद्धी या गावांचा आदर्श घेवून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व पोपटराव पवार यांचा आदर्श घेवून अनेक गावांच्या ग्रामपंचायती बिनविरोध होत होत्या. मात्र, आज या आदर्श गावांतच निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. त्यामुळे या गावांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
तालुकानिहाय बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती
तालुकानिहाय बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या अशी : अकोले 11, संगमनेर 4, श्रीरामपूर 1, राहाता 6, नेवासे 7, नगर 3, पारनेर 9, पाथर्डी 3, कर्जत 2, जामखेड 10, श्रीगोंदा 1. जिल्ह्यातील एकूण 46 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. मात्र कोपरगाव, राहुरी व शेवगाव येथे एकही ग्रामपंचायत बिनविरोध होवू शकली नाही.
उमेदवार संख्या आणि कंसात माघारी घेतलेले अर्ज
अकोले- 566 (385), संगमनेर- 1482 (932), कोपरगाव- 598 (366), श्रीरामपूर- 577 (511), राहाता- 570 (569), राहुरी- 863 (501), पारनेर- 1350 (812), नेवासे- 1020 (932), नगर 1172 (655), पाथर्डी- 1320 (872), शेवगाव- 843 (440), कर्जत- 1003 (655), जामेखेड- 734 (427), श्रीगोंदा- 1096 (953)
केवळ एक जागेसाठी होणार मतदान
श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथे, तर पारनेर तालुक्यातील जातेगाव येथे केवळ एक जागेसाठी मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जातेगाव येथे सात जागांपैकी सहा जागा बिनविरोध झाल्या. मात्र एका जागेसाठी मतदान होत आहे. श्रीगोंदा तालुक्यातील ढोरजा येथे 9 जागांसाठी निवडणूक होणार होती. त्यातील 8 जागा बिनविरोध झाल्या. मात्र, एका जागेसाठी तेथेही निवडणूक होणार आहे.