नाशिक – नव्या संसद भवनाच्या निर्मितीच्या माध्यमातून आजचे केंद्र सरकार हे इतिहास नष्ट करतंय, असा थेट आरोप आता ठाकरे गटाचे प्रमुख प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे. तर जुन्या संसदेत आमचा आत्मा अडकला आहे, असेही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.
संजय राऊत हे नाशिकच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यामांशी संवाद साधला. संजय राऊत म्हणाले, मोदी सरकारला किंवा सरकारच्या समर्थकांना असे वाटते की, हा देश 2014 नंतर निर्माण झाला. तोपर्यंत हा देशच नव्हता.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आणि हा देश निर्माण झाला. देशाला स्वातंत्र्य हे 2014 नंतर मिळाले. असा अपप्रचार केला जात आहे. पण हा क्रांतिकारकांचा अपमान आहे, असे म्हणत त्यांच्याकडून गंभीर आरोप करण्यात आले.
नवीन संसद भवनामुळे अनेक वाद निर्माण झाले आहेत. 1927मध्ये जे संसद भवन निर्माण करण्यात आले, त्या संसद भवनाला एक इतिहास आहे. त्या संसदेत अनेक क्रांतिकार, अनेक स्वातंत्र्यवीर, घटनाकार ज्यांनी देशाची निर्मिती केली अशांचा तिथे सहवास आजही जाणवतो.
आम्ही इतिहास वाचणारी माणसे आहोत. ज्या संसदेत आधी आम्ही बसायचो, तेव्हा आम्हाला तिथे असे वाटायचे की, आम्ही देखील इतिहासाचे साक्षीदार आहोत. इतिहास चालतोय आमच्यासोबत, असेही राऊत म्हणाले.
तर नवीन इमारतीमध्ये आम्हाला आधीच्या संसदेची भावना निर्माण होईल का? आमचा आत्मा त्या जुन्या संसदेत अडकलेला आहे. त्या संसदेत पंडीत नेहरूंपासून इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, अडवाणी असतील या सर्वांचा इतिहास त्या संसदेत होता.
घटनाकार, घटनापीठ सर्व काही तिथे होते. त्या संसदेत देश घडला. त्यामुळे नवी संसद फक्त इमारत आहे, तिथे इतिहास नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.