नवी दिल्ली : देशाचे माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचे निधन झाले आहे. त्यांनी 66 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीमधील एम्स रूग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनानंतर सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त केले जात आहे. जेटली यांच्या जाण्याने देशाचे सर्वात मोठे नुकसान झाले आहे तसेच आमचा मोठा आधार गेल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
आमचा सर्वात मोठा आधार आणि मोठा भाऊ सोडून गेला असल्याची प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. शिवसेना आणि भाजपामधील दुवा म्हणून जेटली यांनी नेहमीच काम केले आहे. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांचीशी जेटली यांचे चांगले संबंध होते. गेल्यावर्षी जेटली माझ्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला आले होते. त्यावेळी ते सर्वांशी आपुलकीने वागत होते. जेटलींच्या जाण्याने भाजपा किंवा शिवसेना नव्हे तर देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान झाल्याची संजय राऊत म्हणाले.