मुंबई – मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आणि भाजपाच्या भोपाळमधील उमेदवार साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरुन राजकारण चांगलेच तापले आहे. मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी मी ज्या दिवशी तुरुंगात गेले त्या दिवशी सुतक सुरु झाले आणि ज्या दिवशी हेमंत करकरे यांना दहशतवाद्यांनी मारले, त्यादिवशी माझे सुतक संपले असे विधान प्रज्ञासिंह यांनी केल्यानंतर मनसेनेही त्यावर टिका केली आहे. मोदी-शहाची टोळी हरेल तेव्हा आमचे सुतक सुटेल असे ट्विट मनसेचे प्रवक्ते अमेय खोपकर यांनी केले आहे.
साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना खोपकर यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ते म्हणाले, मुक्ताफळं म्हणावं की गटारगंगा? हा प्रश्न पडला आहे. स्वत:ला साध्वी म्हणवणाऱ्या भोपाळच्या उमेदवारामुळे आमच्या करकरे साहेबांविषयी नको ते बरळून या कथित साध्वीने भाजपाची देशभक्ती नक्की कशी असते हे दाखवून दिले आहे. याचा नुसता निषेध करुन भागणार नाही, जेव्हा ही मोदी-शहांची टोळी निवडणूक हरेल तेव्हाच आता आमचं सुतक संपेल, असे म्हटले आहे.