ग्रामपंचायती डिजिटल सुविधा पुरविण्यात अपयशी ः 39 ग्रामपंचायतींकडे संगणक चालक नाहीत
कामशेत – सर्वच क्षेत्राचे डिजिटलायझेशन होत असताना ग्रामीण भागातील लोकांना देखील त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ गावातल्या गावात घेता यावा यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायतीत “आपले सरकार’ हे सेवा केंद्र सुरू केले आहे. मात्र, 103 पैकी 39 ग्रामपंचायतीमध्ये संगणक चालकच नाहीत. तर बहुसंख्य ग्रामपंचायतींमध्ये संगणक व इतर साधने उपलब्ध नसल्याने हे सेवा केंद्र निरुपयोगी ठरत आहे.
नागरिकांची शासनाशी संबंधित सर्व कामे आणि आवश्यक कागदपत्रे गावातच उपलब्ध व्हावीत आणि ग्रामपंचायतीचा सर्व कारभार ऑनलाईन व्हावा यासाठी शासनाने प्रत्येक ग्रामपंचायत डिजिटल करून प्रत्येक ग्रामपंचायतीत “आपले सरकार’ हे सेवा केंद्र चालू केले आहे. या द्वारे 62 वेगवेगळ्या सेवा लोकांना पुरविल्या जातात. मात्र मावळातील ग्रामीण भागातील अनेक गावांमधील ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्षात या सुविधा लोकांना मिळत नाहीत.
मावळातील 103 ग्रामपंचायती पैकी 64 गावात आपले सरकार सेवा केंद्राचे चालक आहेत. त्यातील फक्त 27 गावातच डिजिटल सुविधा पुरविल्या जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच महसुली व इतर विभागाच्या सुविधा पुरविण्यासाठी असलेल्या “आपले सरकार’ सेवा केंद्र सुरु करण्याचा उद्देश असफल ठरला आहे.
ग्रामपंचायतीमध्ये या सुविधा पुरविण्यासाठी जे संगणक चालक नेमण्यात येतात त्यांना केवळ सहा हजार रुपये एवढे मासिक मानधन दिले जाते. हे वेतन अत्यल्प असल्याने आणि ते देखील वेळेवर मिळत नसल्याने या चालकांना इतरत्र नोकरीची संधी मिळाल्यास ते हे काम सोडून जातात. परिणामी पुन्हा ग्रामपंचायतीस कमी वेतनात काम करणारा संगणक चालक मिळत नसल्याने मावळात फक्त 64 गावांमध्येच संगणक चालक नेमण्यात पंचायत समितीस यश आले आहे. उर्वरित 39 गावांमध्ये संगणक चालक नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.
आपले सरकार सेवा केंद्र चालकांना वेतन कमी असल्याने ते काम करण्यासाठी तयार होत नाहीत. यामुळे 39 ग्रामपंचायतमध्ये केंद्र चालक नेमण्याचे काम राहिले आहे. या ठिकाणी केंद्र चालक मिळाल्यास मावळातील सर्व ग्रामपंचायत “पेपरलेस’ करणे शक्य होईल.
– सुनील राउत, तालुका व्यवस्थापक, आपले सरकार सेवा केंद्र.