मुंबई – कॉंग्रेस पक्षाची राज्यातील प्रत्येक मतदारसंघात संघटनात्मक ताकद आहे. कॉंग्रेस पक्ष सर्व मतदारसंघाचा आढावा घेणार असला तरी त्याचा आघाडीच्या जागा वाटपावर काही परिणाम होणार नाही. देशभर कॉंग्रेस हाच पर्याय असून भाजपविरोधात जनतेत मोठा असंतोष आहे. भाजपाचा पराभव करणे हेच आमचे लक्ष्य असून या बैठकीनंतर मविआच्या बैठकीत पुढची रणनिती निश्चित केली जाईल, असे महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.
टिळक भवन येथे होत असलेल्या दोन दिवसांच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले प्रसार माध्यमांशी बोलत होते. या बैठकीस माजी मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी दोन दिवस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. आगामी निवडणुकीत मोठा विजय कसा संपदान करायचा यावर या बैठकीत विचारमंथन केले जाणार आहे.
नाना पटोले म्हणाले, कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला. 30 मतदारसंघात भाजपच्या महत्वाच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. महाराष्ट्र हे उत्तर प्रदेशनंतर सर्वात जास्त 48 जागा असणारे राज्य आहे. या प्रत्येक जागेवर विजयी होण्यासाठी काय करता येईल याची व्यूहरचना या बैठकीत ठरवली जाणार आहे. मविआचे घटक पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष, शेकाप, कम्युनिस्ट पक्षालाही जागा वाटपावेळी विचारात घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात आघाडी राहिली पाहिजे – अशोक चव्हाण
दोन दिवसांच्या चर्चेनंतर जागेविषयीचा निर्णय घेतला जाईल. कोणत्या पक्षाने, विशेषतः कॉंग्रेसने कोणत्या जागेवर दावा केला पाहिजे? हे ठरवले जाणार आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी राहिली पाहिजे. म्हणजेच मतांचं विभाजन टाळता येईल. ओपिनिअन पोल यायला सुरुवात झाली आहे.
अर्थात परिस्थितीनुसार पोल बदलत जातात. आजची परिस्थिती लक्षात घेतली तर तिन्ही पक्षांनी एकत्र राहून निवडणुका लढवल्या तर क्षमता असलेल्या पक्षाला जागा दिल्या गेल्या पाहिजे असा सर्वसाधारण कल आहे, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले