15 मे हा जागतिक कुटुंबदिन म्हणून साजरा होतो. नैसर्गिक कुटुंब हे राष्ट्राचे भवितव्य आहे असे मानणाऱ्या वर्ल्ड फॅमिली कॉंग्रेसची स्थापना 1997 मध्ये डॉ. ऍलन कार्लसन यांनी केली. या संघटनेतर्फे पहिली आंतरराष्ट्रीय परिषद 1997 साली प्राग येथे झाली. दुसरी परिषद 1999मध्ये जिनिव्हा येथे भरली. तिसरी 2004 मध्ये मेक्सिको सिटी येथे झाली तर चौथी वॉर्सा येथे 2007 साली झाली. या परिषदेत कुटुंबव्यवस्थेचा पुरस्कार करणाऱ्या सुमारे 75 देशांचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाले. त्यांनी आपापल्या देशामधे कुटुंब अध्ययन केंद्रे स्थापन केली आहेत. हजारो वर्षांचा कुटुंब-विवाहसंस्थेचा इतिहास असलेल्या भारताचा मात्र या कुटुंब परिषदांमधला सहभाग नगण्य आहे. भारताकडून या बाबतीतले आयोजनही होत नाही आणि कुटुंबविषयक धोरण ठरवण्यातही त्याचा सहभाग नसतो. आपली कुटुंबव्यवस्था इतकी उत्तम आहे की आपल्याला कशाचीच गरज नाही, असा बहुधा आपला समज असावा.
आपली कुटुंबव्यवस्था खरोखरच इतकी आदर्श आहे का? त्यात काही सुधारणा करण्याची आपल्याला गरजच वाटत नाही का? खरे तर, कोणतीही व्यवस्था निकोप व्हायची असेल तर तिचे हेतू शुद्ध हवेत. कुणाचे तरी हितसंबंध जपण्यासाठी दुसऱ्या कुणावर एखादी व्यवस्था लादल्यास ती फार काळ चांगल्या तऱ्हेने टिकून राहू शकत नाही.
मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या काळात मातृसंस्कृती अस्तित्वात होती. स्त्री ही कुटुंबप्रमुख होती. तिची मुले आणि इतर पुरुष (भाऊ, पिता, मुलगा) हे या मातृकुटुंबाचे सदस्य असत. मातृकुटुंब म्हणजे स्त्रीच्या रक्तसंबंधियांचे कुटुंब होते. ते पोसण्याची धमक जोपर्यंत स्त्रीकडे होती, तोपर्यंत तिच्या वंशावळीचे महत्त्व टिकून होते. पुढे नांगरशेतीमुळे पुरुषाची शेतीव्यवसायातील भूमिका दिवसेंदिवस स्त्रीपेक्षा मोठी होत गेली. पुरुष सामाजिक सत्तेवर आला. जमीनदार पुरुषांचे महत्त्व वाढत गेले व नैसर्गिक मातृकुटुंब लयाला जाऊन तिथे पुरुषाच्या मालकीची कुटुंबव्यवस्था प्रस्थापित झाली.
पुरुषप्रधान समाजव्यवस्थेमुळे भारतातली बरीचशी कुटुंबे आज स्त्रीच्या त्यागावरच उभी आहेत. घराची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर पडते. पण इतके करूनही जर कुटुंबामध्ये त्यांना मान, आदर मिळाला नाही तर “नकोच ते लग्न आणि नकोच ते कुटुंब’ अशी त्यांची प्रतिक्रिया झाल्यास नवल नाही. यातूनच “लिव्ह-इन-रिलेशनशिप’ हा प्रकार समाजात सुरू झाला आहे. मात्र सहजीवनाची ही पद्धत फारशी हितावह नाही. यामध्ये मुलांचा विचार केलेला नाही. कुटुंबातील वृद्ध, अपंग यांचाही विचार होत नाही. आजपर्यंत या सगळ्या जबाबदाऱ्या घरातील स्त्रीच्या मानल्या जात. आता ही गृहिणी या दुय्यम स्थानास कंटाळली आहे. म्हणून आपल्या कुटुंबसंस्थेचा कणा स्त्री आहे हे लक्षात घेऊन तिच्या अपेक्षा, तिच्या गरजा आपण समजावून घ्यायला हव्यात. कुटुंबव्यवस्था टिकली पाहिजे असे नुसते म्हणून चालणार नाही. कुटुंबसंस्थेची अधिक मोडतोड होण्यापूर्वीच ती सावरली पाहिजे. म्हणून “कुटुंब सर्वांचे आणि सर्वांसाठी कुटुंब’ हा विचार आचरणात आणला पाहिजे.
अनेक राष्ट्रांना कुटुंबसंस्थेचे महत्त्व आता कळले आहे. जगातल्या अनेक देशात कुटुंबव्यवस्थेचे अध्ययन करणाऱ्या संस्था आहेत. परंतु भारतात मात्र असे कुटुंब अध्ययन केंद्र स्थापन झाल्याचे ऐकिवात नाही. सरकारी पातळीवरही कुटुंबविषयक धोरण व दृष्टिकोन नाही, हे विदारक सत्य आहे. कुटुंबविषयक धोरण म्हणजे कुटुंब नियोजनाचे धोरण नव्हे. अर्थात कुटुंबनियोजनामधेही पुरुषांची माघार आहे. ही शस्त्रक्रिया करणाऱ्या पुरुषांना 1350 रु. मदत मिळते. तरीही 2011मधे 14 हजार शस्त्रक्रिया झाल्या आणि त्यापैकी पुरुष फक्त दोनशे होते. कुटुंबकल्याणात याही बाबतीत पुरुषांचा सहभाग नसतो. ती जबाबदारी महिलांची आहे, असे गृहीत धरले जाते. कुटुंबनियोजनाची जबाबदारीही स्त्रीवर टाकून पुरुष मोकळा झालेला आहे.
सुदृढ आणि समन्यायी कुटुंबव्यवस्थेची उपयुक्त्तता ध्यानी घेऊन, ती टिकण्यासाठी काय करता येईल याचा विचार व्हायला हवा. कुटुंबव्यवस्थेची आव्हाने डोळसपणे स्वीकारायला हवीत. आज आपल्या कुटुंबव्यवस्थेवर कोणते आघात होत आहेत, त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. इतकेच नव्हे, तर भारतीय जीवनात आपण खरोखरच कुटुंबव्यवस्थेस महत्त्वाचे स्थान देत असू तर कोणतेही आर्थिक, आरोग्यविषयक, राजकीय, सामाजिक धोरण ठरविताना त्याचे कुटुंबव्यवस्थेवर कोणते परिणाम होतील याचा विचार करायला हवा! आपली जीवनमूल्ये लक्षात घेऊन त्यानुसार धोरण आखायला हवे. इतर अनेक देशात असे प्रयत्न गांभीर्याने होत आहेत.
कुटुंबव्यवस्था जगवायची असेल, ती परिपुष्ट करायची असेल तर त्यासाठी सर्वांचा हातभार लागायला हवा. या कुटुंबात प्रत्येकाला व्यक्तिविकासाची संधी मिळायला हवी. परस्परांच्या विचारांनी निर्णय व्हायला हवेत. कुटुंबातील लहान मुले, वृद्ध, अपंग यांची जबाबदारी सर्वांनी सारखी वाटून घ्यायला हवी; तरच ही कुटुंबसंस्था टिकेल. सुदृढ आणि समन्यायी कुटुंबव्यवस्थेची उपयुक्त्तता ध्यानी घेऊन, ती टिकण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला तरच आपला अभिमानाचा विषय असलेली कुटुंबव्यवस्था आपण टिकवून ठेवू शकू.
– माधुरी तळवलकर