मुंबई – विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का देत राष्ट्रवादीने ५६ जागा मिळवल्या. या पार्श्वभूमीवर पावसात भिजण्याचा आमचा अनुभव कमी पडल्याचा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना अप्रत्यक्षपणे लगावला आहे. वर्षा बंगल्यावर आज माध्यमांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी फडणवीसांनी ऑफकॅमेरा हे विधान केले.
विधानसभा निवडणुकीत सातारा येथे भर पावसात ७९ वर्षीय पवार यांनी वय आणि प्रकृतीची तमा न बाळगता सभा घेतली. ही सभा चांगलीच गाजली. याचीच प्रचिती म्हणजे साताऱ्यात माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला.
दरम्यान, महाराष्ट्राची सत्ता राखण्यात महायुतीला यश आले असले तरी दोनशे जागांचा आकडा पार करण्याचे उद्दिष्ट सत्ताधारी गाठू शकले नाहीत. तर महाआघाडीने जवळपास शतकी मजल मारली. त्यामागे शरद पवार हा फॅक्टर महत्वाचा ठरला.