नगर – आमचा पराभव झाल्यानंतर जी वस्तुस्थिती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडली, त्यावर आम्ही ठाम आहोत. पराभवबद्दल पुरावे घ्या व उदाहरण द्या असे विखे यांनी वक्तव्य केले होते. पण आम्ही त्याच वेळेला एक ना अनेक उदाहरणे दिली आहेत. पराभवाच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून आजी-माजी तिन्ही आमदारांची चौकशी झाली आहे, असल्याचे वक्तव्य माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
दरम्यान जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आमची नाराजी कायमच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. नगर येथे एका कार्यक्रमाप्रसंगी आल्या असता माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, आमचा पराभव झाल्यानंतर आम्ही मुंबईमध्ये लेखी पत्र दिलेले आहे. त्यावर सर्व आजी माजी आमदारांच्या सह्या आहेत. त्यामध्ये बबनराव पाचपुते, बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह मोनिका राजळे, राम शिंदे, स्नेहलता कोल्हे व माझी सुद्धा सही आहे. त्यामुळे आमचे म्हणणे आम्ही लेखी स्वरूपात सुद्धा दिलेले आहे.
कोणीही भूमिकेबद्दल बदल केलेला नाही, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली. आमची भूमिका आम्ही त्यावेळेला पक्षाकडे मांडलेली आहे. त्या भूमिकेवर आजही आम्ही ठाम आहोत. त्या वेळी झालेल्या चर्चेमध्ये पराभवाची चौकशी केली जाईल, असे सांगण्यात आले. त्यानुसार विजय पुराणिक तसेच भाजपाचे निरीक्षक काळकर यांची चौकशीसाठी नियुक्ती झाली असून चार दिवसांपूर्वी माझ्या घरी राम शिंदे, मोनिका राजळे व माझी स्वतःची चौकशी केलेली आहे.
आम्ही सर्व पुरावे तसेच आमच्या म्हणे आम्ही त्या समितीसमोर सादर केलेले आहेत. लवकरात लवकर समिती या प्रकरणाची चौकशी करेल, असे आम्हाला वाटते जोपर्यंत चौकशी पूर्ण होणार नाही. तोपर्यंत आमची नाराजीही कायमच आहे, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. चौकशी समिती पारदर्शीपणे चौकशी करेल असे त्यांनी यावेळी सांगितले.
ज्यावेळेला मुंबई येथे बैठक झाली या बैठकीला राधाकृष्ण विखे सुद्धा उपस्थित होते. त्यांच्या समोरच आम्ही आमची नाराजी व्यक्त केलेली आहे. खासदार सुजय विखे यांनी जे वक्तव्य केले, त्यावर विचारले असता कळले यांनी एक काय अनेक उदाहरण आम्ही त्यावेळेला दिलेले आहेत, असेही ते म्हणाले. या संदर्भातील नाराजी कायम असल्याचे त्यांनी सांगितले. जी चौकशी समिती नेमली आहे, ती आपली चौकशी पारदर्शकपणे करेल, याबद्दल शंका नाही. कारण कॉंग्रेस आणि भाजपा यांच्यामध्ये निश्चित फरक आहे. भाजपमध्ये कॉंग्रेस सारखे प्रकार चालत नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नगर जिल्ह्याचा पालकमंत्री हा नगर जिल्ह्याचा पाहिजे.कारण त्याला या जिल्ह्यातील प्रश्न माहीत असतात. ते कसे सोडवायचे हे पण माहीत असतात बाहेरचे पालकमंत्री दिल्यामुळे अनेक विषय प्रलंबित राहतात, हे उदाहरण आहे. वास्तविक पाहता मंत्री बाळासाहेब थोरात सारखा सिनियर मंत्री जिल्ह्यात असताना त्यांच्याकडे पालकमंत्रिपद द्यायला पाहिजे होतं.
मात्र ते दिले गेले नाही. कारण दोन्ही पक्षांचा एकमेकांवर विश्वास नसल्यामुळे बाहेरचा पालकमंत्री देण्याची वेळ आली असल्याचाही आरोप त्यांनी केला. जर मंत्री थोरात यांना पालकमंत्री केले असते, तर निश्चितपणे जिल्ह्यात विकासाला संधी मिळाली असती, असे ही त्यांनी सांगितले. राज्यामध्ये महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले आहे. वास्तविक पाहता सध्याचे वक्तवे बघता त्यांच्यामध्ये तालमेळ दिसून येत नाही. मात्र नव्याने सारखा स्थापन झाल्यामुळे त्यांना सहा महिन्याचा अवधी दिला गेला पाहिजे, असेही ते म्हणाले.
राम शिंदे यांची भूमिका योग्य
जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी विखे पिता-पुत्र सोबत कोणताही समेट झाला नाही, अशी भूमिका मांडली होती. यावर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांना विचारले असता ते म्हणाले, राम शिंदे यांची भूमिका योग्यच आहे, दरम्यान यावरून अद्यापि भाजपमध्ये सर्वकाही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत आहे.