आमच्या लहानपणी आम्ही फेकत नव्हतो असं नाही. शाळेत असताना दुपारी कंटाळा आला तर “पोटात दुखतंय’ अशी फेकून सरांच्या डोळ्यात पाणी आणलं की सर प्रेमाने घरी सोडायचे. शिवाय शेजारी बसणाऱ्या आणि शेजारी राहणाऱ्या मित्राला देखील “याला घरी घेऊन जा रे,’ असं सांगून माझ्या बरोबर धाडायचे. एखाद्या दिवशी पूर्ण बुट्टी मारली की दुसऱ्या दिवशी घरातल्या कोणाचं तरी आजारपण किंवा निधन रंगवून सांगायचो. ते ऐकून सरांच्या हृदयाला पाझर फुटला तर गृहपाठ न केल्याबद्दल देखील माफी मिळायची. सरांना शंका आली तर चार छड्या मिळत. त्याचं तेव्हा काही वाटत नसे.
कॉलेजमध्ये गेल्यावर शेवटच्या वर्षी बहुतेकांना नोकऱ्या लागल्या. आपापल्या प्रेयश्यांना मागणी घालताना पगाराचे आकडे फुगवून सांगितले. तरीही अनेकांना नकार मिळाले. आम्ही संसाराला लागलो. काही वर्षांनी रस्त्यावर जुनी मैत्रीण भेटली आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र दिसलं की आम्ही विचारायचो, लग्नाला बोलावलं नाहीस? ती म्हणायची, अरे खूप घाईत ठरलं. बऱ्याच जणांना बोलवायचं राहून गेलं. आपल्या प्रत्येक मैत्रिणीचं लग्न खूप घाईत का ठरलं असावं हा प्रश्न तेव्हा नाही पण आता पडतो आणि शिवाजी साटम साहेबांचं वाक्य आठवतं, “दया, कुछ तो गडबड है’.
आपण देव आनंदसारखे दिसतो असा भ्रम असलेला जोशा देव आनंदप्रमाणे विचित्र कपडे शिवायचा. तिरका चालायचा. सीमा नावाच्या मैत्रिणीशी त्याचं सूत जमलं होतं. कॅंटीनच्या मागे आडोसा धरून ते बसायचे. सध्या करोनाच्या भीतीमुळे सलगीचे जे प्रकार डॉक्टरांनी टाळायला सांगितले आहेत ते प्रकार आणि फिल्मी हिरोंच्या प्रेमाच्या अभिव्यक्तीचे आविष्कार जोशा आणि सीमा करीत- असं जोशा सांगायचा. ती वर्णनं ऐकून की आम्ही जाम जळायचो. एकदा आम्ही काही मित्र देव आनंदचा “तेरे मेरे सपने’ बघायला गेलो होतो. पुढच्या रांगेत जोशा एकटाच बसलेला होता. त्याने आम्हाला बघितलं नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्याने सीमासह “तेरे मेरे सपने’ बघायला कशी मज्जा आली ते रंगवून सांगितलं. आम्ही पण त्याला खोट्यात पाडलं नाही. दोस्ती आखिर दोस्ती होती है.
नोकरीत असताना सिक लीव्ह दाबून घेतल्या. पंचवीस वर्षे नोकरी झाल्यावर बाजारात मोबाइल आले. आम्ही घेतले. त्यावर बंडला मारायची सवय व्हायला आणि सफाई यायला वेळ लागला. आपण घरात नाही, कुठं तरी बाहेर आहोत ही थाप मारायची असेल तर मोबाइलवर बोलत बोलत बाल्कनीत यायची सवय मोडायला हवी हे उशिरा समजलं. कारण असं सांगत असताना मित्र घराच्या खाली उभा राहून फोन करीत होता. एकदा एक नकोसा मित्र घरी रहायला येणार म्हणत होता.
मी स्वारगेट बस स्थानकावर उभा होतो. त्याला म्हटलं की मी आत्ता गोव्यात आहे. तेवढ्यात स्पीकरवरून उद्घोषणा झाली की पुणे-कोल्हापूर बस नंबर अमुक फलाट क्रमांक तमुकवर उभी आहे. प्रवाशांनी बसून घ्यावे. नोकरीतून रिटायर झाल्यावर फेसबुकचा परिचय झाला. इथे माझ्याहून सवाई भेटले. एकाने सांगितलं की लिंबे फ्रिजच्या वरच्या कप्प्यात ठेवून कडक झाली आणि मग त्यांच्या साली किसून खाल्ल्या की कर्करोग बरा होतो असं डॉक्टर विकास आमटे यांनी सांगितलं आहे.
डॉक्टर आमटे यांच्या नावाने ती फेक पोस्ट व्हायरल झाली होती. पण सांगणारा आत्मविश्वासपूर्वक सांगत होता. मी त्याला सांगितलं की माझी डॉक्टरांशी ओळख आहे. त्यांनी असं काही म्हटलेलं नाही. त्यानं मलाच खोट्यात काढलं. करोना विषाणू आल्यावर व्हॉट्सऍप विद्यापीठातल्या थापाड्यांना अधिकच चेव आला. हा विषाणू अमेरिकेने/रशियाने/चीनने बनवला आहे, गोमूत्र प्राशन/तुळशीचा काढा/निलगिरी तेल त्यावर जालीम उपाय आहेत वगैरे गोष्टी लोक सांगू लागले. व्हॉट्सऍप विद्यापीठाचा हवाला देत एकाने सांगितले की चिनी लोकांनी वटवाघळे मारून खाल्ली. त्यांचा करोनामध्ये पुनर्जन्म झाला. आता करोना मानवाचा सूड घेत आहे. मी म्हणालो, या घटनेवर भन्साली-वर्माचा “बदले की आग’ सिनेमा येतो आहे. करोना सूड घ्यायला इंडियात येतो. डान्स बारमध्ये लेडी नाफेलिसचे नृत्य बघून तिच्या प्रेमात पडतो. भन्सालीच्या प्रथेनुसार वटवाघळाची आई आणि नाफेलिसची आई भेटतात. करोनाच्या लग्नाच्या वरातीसमोर दोघी “दिल डोला रे डोला’ गाण्यावर नागिन डान्स करतात.
“तुला कोणी सांगितलं?’
“व्हॉट्सऍपवर आलंय ना.’
“मग प्रश्नच नाही. ते नक्की खरं असणार,’ तो मुंडी हलवीत म्हणाला.
विजय तरवडे