मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या ऋतुजा लटके, भाजप-शिंदे सेना-रिपाइंचे मुरजी पटेल यांनी काल अर्ज भरले. दरम्यान, मागील ४-५ दिवसांपासून लटके यांच्या राजीनाम्यावरून राजकारण तापले होते. परंतु न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांचा राजीनाम्याचा मार्ग मोकळा झाला. दरम्यान, याच मुद्द्यावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर पुन्हा एकदा खोके सरकार म्हणत सडकुन टीका केली आहे.
ऋतुजा लटके यांच्या राजीनामा प्रकरणावर बोलताना आदित्य ठाकरे यांनी “राजीनामा न घेण्यासाठी पालिकेवर सरकारचा दाबाव होता. खोके सरकारचे हे घाणेरडे राजकारण आहे. आमची लढाई ही माणुसकी विरुद्ध खोकासुर अशी आहे,” अशी टीका केली.
“ही जागा पहिले काँग्रेसची होती. त्यानंतर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी लटकेंचा विजय झाला होता. त्यांनी कामही चांगलं केलं होतं. आज आमची लढाई लोकशाहीसाठी, संविधानासाठी आणि लटके परिवारासोबत राहण्यासाठी आहे,” असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी, “लटके ताईंना रोखण्याचे, सतावण्याचे प्रयत्न करण्यात आले. ही कोणत्याही प्रकारची लोकशाही नाही. त्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला रोखण्याचे प्रयत्न केले. आमचं सर्वकाही हिसकावून घेतलं, जनतेचं प्रेम आमच्यासोबत आहे आणि तेच आम्हाला विजय मिळवून देतील,” असेही त्यांनी सांगितले.