पणजी – ओटीटी (ओव्हर द टॉप) च्या पदार्पणावेळी चित्रपटगृह व्यवसाय बंद होईल या भीतीने मोठा विरोध झाला होता. ओटीटी आणि टीव्ही चॅनेल असूनही पारंपारिक चित्रपट उद्योग आपले स्थान कायम राखून आहेत. ते चित्रपटाच्या मनोरंजन व्यवसायाला आर्थिकदृष्ट्या पूरक असल्यामुळे ते अधिक फायदेशीर ठरतात. ओटीटीच्या प्रेक्षकवर्गात झपाट्याने वाढ होत असून सध्या ही संख्या 20 टक्के आहे. कमी बजेटच्या चित्रपटांना जागतिक प्रेक्षक मिळवून देण्यासाठी ओटीटी सहाय्य करते. त्याचवेळी, चित्रपट उद्योगातील काही सृजनशील व्यक्तींना त्यांचे चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित व्हावेत अशी इच्छा आहे, असे मत मल्याळी निर्माते आणि वितरक जी पी विजयकुमार यांनी व्यक्त केले.
गोवा येथे आयोजित 51 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा दरम्यान आज आभासी पद्धतीने आयोजित केलेल्या “भारतीय चित्रपट निर्मिती मधील बदलती परिस्थिती’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते.
कोविड-19 मुळे उद्भवलेल्या परिस्थितीमध्ये ओटीटीमुळे चित्रपट निर्मात्यांना या कठीण काळात काही प्रमाणत उत्पन मिळविण्याचे साधन मिळाले, असे ते म्हणाले.
दुसरीकडे, मागील काही वर्षांमध्ये चित्रपटाचे प्रदर्शन आणि जाहिरातीचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सॅटेलाईट मार्केट तेजीत असताना, 90 च्या दशकात उत्पादन खर्च वाढला, तर मल्टिप्लेक्सच्या संख्येमध्ये अनेक पटींनी वाढ झाली, ज्यामुळे 2010 मध्ये या उद्योगाचा बऱ्याच प्रमाणात ऱ्हास झाला, असे वास्तव त्यांनी मांडले.
सरफरोश-2 ची पटकथा पाच वेळा लिहिली – जॉन मॅथ्यू मथान
मी माझ्या चित्रपटाच्या आशयाच्या शोधात संपूर्ण भारत फिरलो आहे. कोणत्याही चित्रपट निर्मात्यासाठी सामाजिक आणि राजकीय मुद्दे समजून घेणे महत्वाचे आहे. मला वाटते लेखक किंवा दिग्दर्शकाने समाजाप्रती संवेदनशील असले पाहिजेत. कोणाच्याही भावना न दुखावता आपल्याला आपला मुद्दा मांडता आला पाहिजे. चित्रपटातील गाणी ही त्या चित्रपटाच्या कथेला पूरक असली पाहिजेत. ज्या वेळी या चित्रपटाची निर्मिती केली तेव्हा कमाईच्या दृष्टीने संगीत हा या चित्रपटाचा एक मोठा घटक होता. या चित्रपटात दोन रोमॅंटिक गाणी करण्याची चित्रित करण्याची कल्पना मला आवडली नव्हती. मी सरफरोश 2 ची पटकथा अंतिम करण्यापूर्वी ती अंदाजे 5 ते 6 वेळा लिहिली. सरफरोश-2 ची ही प्रत्यक्षातली पाचवी पटकथा आहे ज्यावर आता चित्रपटाची निर्मिती केली जाईल, असे जॉन मॅथ्यू मथान यांनी सांगितले. DO YOU HAVE IT? या शिर्षकाअंतर्गत आयोजित आभासी संवाद सत्रात ते फरदीन शहरीयार यांच्याशी संवाद साधत होते.
मला केवळ एकच काम उत्तम येतं, मुलांची काळजी घेणं
आज आपण ज्या जगात राहतो आहोत, त्यात जणू दोन जग आहेत- एका ‘आपले’ आणि एक ‘त्यांचे’, असे जग ज्यात ‘आपण’, ‘त्यांना’ समजून घेण्यात कमी पडतो. आमचा चित्रपट असे जग दाखवणारी खिडकी आहे, कुठल्याही नियम-रुढींच्या चौकटीत न बसणाऱ्या या जगाला केवळ प्रेमभावनेने समजून घेता येऊ शकते. तसे केले, तरच आपण त्यांना एका जगात सामावून घेऊ शकणारा मार्ग निर्माण करू शकू, अशा ‘एका’जगात, जिथे आपण सगळे परस्पर-स्नेहाचे सहजीवन आणि परस्परांचा आदर ठेवून एकत्र राहू शकू, असे मत ‘इन अवर वर्ल्ड’ या माहितीपटाचे दिग्दर्शक बी एस श्रीधर यांनी व्यक्त केले. इफ्फीच्या आजच्या चौथ्या दिवशी श्रीधर यांनी पत्रकार परिषदेतून ‘स्वमग्नतेच्या’ मानसिक आजाराविषयी माहिती देत अशा मुलांच्या भावविश्वाची ओळख करुन दिली. यावेळी “पिंकी इलि?’ या चित्रपटाचे दिग्दर्शक पृथ्वी कोन्नुर आणि अभिनेत्री गुंजलम्मा याही उपस्थित होत्या.