वडगाव मावळ – पवना धरणग्रस्तांचा प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावला नाही; तर पवना धरणग्रस्तांसमवेत आंदोलन उभारुन धरणाचे पाणी बंद करण्यात येईल, असा इशारा आमदार सुनील शेळके यांनी पुणे येथे शुक्रवारी (दि.25) रोजी झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दिला. या बैठकीस राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार व पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.
मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. पवना धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्याकरिता जागा उपलब्ध नसल्याचे एकीकडे सांगितले जाते; तर दुसरीकडे इतर भागातील पुनर्वसित शेतकऱ्यांच्या नावाखाली एजंटांना मावळातील जागा दिल्या जातात. हा विरोधाभास दिसत आहे. याचा गांभीर्याने विचार होऊन यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आमदार शेळके यांनी यावेळी केली.
मागील काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पवना धरणग्रस्तांच्या पुर्नवसनाविषयी आमदार शेळके सातत्यपूर्ण पाठपुरावा करत आहेत.शेळके यांनी मागील तीन वर्षांपासून महसूल, जलसंपदा अशा सर्व विभागांच्या बैठका घेऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात केली होती. विधीमंडळाच्या अधिवेशनात देखील त्यांनी याविषयी आवाज उठविला होता. परंतु त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झाले नाही.त्यामुळे या बैठकीत आमदारांनी पवना धरणाचे पाणी बंद करण्याचाच इशारा दिल्याने राज्य सरकारकडून याची नक्कीच दखल घेतली जाईल.
पाणी बंदच्या पवित्र्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत दहा दिवसांत बैठक आयोजित करुन सकारात्मक निर्णय घेऊ. तसेच व पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लावू असे आश्वासित केले आहे.
– सुनील शेळके, आमदार
धरणग्रस्तांची एकजूट कायम
धरणासाठी विस्थापित झालेले तालुक्यातील शेतकरी गेली अनेक वर्षांपासून या प्रश्नाचा पाठपुरावा करत आहे. त्याकरिता गावनिहाय बैठका घेत, मावळ तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले आहे. त्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून तालुका प्रशासनाकडे सतत पाठपुरावा केला जात आहे.