सातारा – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाची सातारा-पुणे टप्प्यात खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदारांना या समस्येशी देणेघेणे नाही. वारंवार निवेदने देऊन आणि चर्चा करूनही रस्ता नीट होत नसल्याने जनता त्रस्त आहे. सातारा-पुणे मार्गाची त्वरित दुरुस्ती करावी.
टोल नाक्यांवर आवश्यक सोयीसुविधा पुरवाव्यात अन्यथा टोल नाका बंद करावा, अशा मागणीचे निवेदन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नागपूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या संदर्भात लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्याचे आ. शिवेंद्रराजेंनी सांगितले.
दरम्यान, आज आनेवाडी येथे टोलबंद आंदोलन सुरु केले आहे. दरम्यान, त्यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. रस्त्याची दुरुस्ती, टोल नाक्यावरील सोयीसुविधा पुरवणे याबाबत त्यांच्याशी चर्चा केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास हे काम जमत नसेल तर या रस्त्यावर टोलवसुली बंद करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पुणे-बंगळुरू महामार्गाच्या दुरुस्तीसाठी शिवेंद्रराजेंचे मुख्यमंत्र्यांना साकडे