पाटण – पाटण तालुक्यात अनेक वर्षांपासून धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. निष्क्रिय प्रशासक आणि प्रकल्पग्रस्तांबाबत असलेला अनादर यामुळे पाटण तालुका आणि प्रकल्पग्रस्त कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. तालुक्यातील धरणग्रस्त-प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आठ दिवसांत मार्गी लागले नाहीत, तर पुढील सोमवारी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना खेकडा वाटप आंदोलन करणार असल्याचा इशारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पाटण बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला.
विक्रमबाबा म्हणाले, प्रकल्पग्रस्तांना पाण्याची आवश्यकता असताना राज्यकर्ते आणि सनदी अधिकारी स्वत:च्या कारभारामध्ये व्यस्त आहेत. तालुक्यात शासनाने अडविलेले पाणी, त्याची केलेली विक्री व शासकीय अधिकाऱ्यांचा झालेला खर्च शासनाने आठ दिवसांत जाहीर करावा, अन्यथा प्रकल्पग्रस्त त्यांच्या जमिनीमध्ये खेकड्यांची शेती करतील. कोयना धरणग्रस्त-प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे काम शासन दरबारी प्रगतीपथावर असून या कामात महसूल विभागातील अधिकारी हलगर्जीपणा करताना दिसून येत आहेत. पुढील आठ दिवसांत धरणग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत. तर तालुक्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना तहसील कार्यालयासमोर खेकडा वाटप करणार असल्याचे विक्रमबाबा पाटणकर यांनी सांगितले.