मुंबई : राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने आता अनेक जिल्ह्यांत शाळा-महाविद्यालयांसह आठवडी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भातील आदेश काढले असून, ३१ मार्चपर्यंत शैक्षणिक संस्था बंद राहणार आहेत. त्यातच आता मुंबईतही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मुंबईतही लॉकडाऊन होतय की काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
करोना नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारकडून हळूहळू नागरिकांना बंधनातून सूट दिली होती. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आलं होतं. मात्र वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईतील जनजीवनाला पुन्हा ब्रेक लागण्याची शक्यता आहे. मुंबईचा रुग्णवाढीचा दर ०.२२ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. यातच मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.
अस्लम शेख म्हणाले की, ज्याठिकाणी लग्न आहे तिथे ५० लोकांची परवानगी असताना ३०० लोकं उपस्थित राहतात. त्यांच्यावर कारवाई केली आहे. नाईट पबवर कारवाई केली असून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलचे परवाने रद्द केले आहेत. शासनाकडून जे जे पर्याय आहेत ते शासन करतंय. परंतु मुंबईकरांनीही स्वत:ची जबाबदारी ओळखावी, कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास मुंबईत लॉकडाऊन करावं लागेल असे संकेत त्यांनी दिलेत.