पिकवणारा टिकला तरच खाणाऱ्यांना खायला मिळेल
उस्मानाबाद: उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील संयुक्त महाआघाडीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांनी जनतेशी संवाद साधला. आपल्या देशातील शेतकरी हे मोदी सरकारच्या काळात दुष्काळ आणि सरकारी अनास्थेमुळे होरपळत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून सत्तेत आल्यास शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा पवार यांनी केली आहे.
सत्तेत असताना आम्ही शेतकऱ्यांना ७२ हजार कोटींची कर्जमाफी दिली. पण या सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची चिंताच नाही, अशी टीका पवार यांनी व्यक्त केली.
सध्या भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र नरेंद्र मोदी किंवा फडणवीस यांना शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ३४ हजार कोटींच्या कर्जमाफीची घेाषणा केली. मात्र, ऑनलाईनच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक झाली, १०-१५ टक्के शेतकऱ्यांनाही कर्जमाफी मिळाली नाही.
आम्ही सत्तेत असताना भाजपावाले, भाववाढ झाल्यामुळे कांद्याच्या माळा गळ्यात घालून संसदेत आले होते. त्यांनी भाव कमी करण्यासाठी आंदोलन केले. मात्र आम्ही भाव कमी केले नाहीत. पिकवणारा टिकला तरच खाणाऱ्यांना खायला मिळेल, अन्यथा परदेशातून अन्नधान्याची आयात करावे लागेल, हे त्यांना पटवून सांगितले. मात्र, सध्या शेतमालाला भाव मिळत नाही, अशी खंत पवार यांनी व्यक्त कली. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असलेल्या व्यक्तींना निवडून आणावे लागेल, असे आवाहन त्यांनी जनतेला केले.