नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी हॅटट्रिक करत तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत. त्यांचा मुख्यमंत्रीपदाची शपथविधी सोहळा येत्या रविवारी होणार आहे. मात्र या शपथविधीसाठी इतर कोणत्याही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना किंवा इतर पक्ष्यांच्या नेत्यांना बोलवण्यात येणार नसल्याचे सांगण्यात येत आहे.
आपचे नेते गोपाल राय यांनी याविषयी माहिती दिली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी रविवारी 16 फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे. दोन दिवसांपूर्वीच दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. यावेळी केजरीवाल यांच्या नेतृत्त्वाखाली आपने 70 पैकी 62 जागांवर विजय मिळवला. भाजप आणि कॉंग्रेससारख्या मोठ्या पक्षांचे आव्हान मोडीत काढत आपने दिल्लीवर तिसऱ्यांदा आपले वर्चस्व सिद्ध केले.
येत्या रविवारी रामलीला मैदानात केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. मात्र या सोहळ्यात कोणत्याही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा कोणत्याही पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना बोलवण्यात येणार नाही. हा सोहळा केवळ दिल्ली आणि दिल्लीवासीयांपुरताच मर्यादित राहणार आहे, असे राय यांनी स्पष्ट केले आहे. केवळ दिल्लीच्या लोकांनाच या सोहळ्यासाठी आमंत्रण असेल असेही त्यांनी सांगितले.