परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने केला दावा
नवी दिल्ली – भारताने अयोध्या प्रकरणातील कोर्टाच्या निकालाबाबत जगातील अन्य देशांनांही वस्तुस्थिती समजाऊन सांगितली आहे. भारताने केलेल्या खुलाशानंतर बहुतांश देशांचे समाधान झाले आहे अशी माहिती भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने दिली आहे. या मंत्रालयाचे प्रवक्ते रविशकुमार म्हणाले की भारतात जर काही महत्वाची घडामोड घडत असेल तर त्याविषयीची माहिती अन्य संबंधीत देशांना देणे ही भारताची जबाबदारी आहे.
तसेच राजनैतिक वर्तुळातून एखाद्या प्रकरणाविषयी माहिती विचारली जाणार असेल तर त्यांना ती माहिती देणे ही आपली जबाबदारी असते त्यानुसार आम्ही संबंधीत देशांना या विषयीचा तपशील दिला आहे. या संबंधात भारताने दिल्लीतल्याच काही विदेशी दुतावासांना या विषयीची माहिती देण्यात आली आहे असे ते म्हणाले. अयोध्या हा भारताचा अंतर्गत मामला आहे आणि आमच्या देशातील सर्वोच्च न्यायालयाने त्या विषयी दिलेला हा निर्णय आहे अशी या संबंधातील भारताची प्रमुख भूमिका होती.
त्यादृष्टीकोनातूनच या प्रकरणाकडे पाहिले जावे अशी आमची अपेक्षा आहे असे आम्ही संबंधीत देशांना सांगितले आहे. आम्ही हा खुलासा केल्यानंतर त्यावर जगातील कोणत्याही देशाकडून कोणतीही विपरीत प्रतिक्रीया आलेली नाही यावरूनच आम्ही त्यांचे समाधान करण्यात यशस्वी ठरलो आहोत असा निष्कर्ष आपण नक्की काढू शकतो असे ते म्हणाले.
अयोध्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने 2.77 एकराची वादग्रस्त जागा राम मंदिर उभारणीच्या कामासाठी देण्याचा निर्णय दिला आहे. त्या अनुषंगाने भारततर्फे ही माहिती देण्यात आली आहे. तथापी भारताने या बाबतीत नेमक्या कोणत्या देशांना ही माहिती दिली त्या देशांची नावे मात्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाहीत.