उस्मानाबाद : राज्यात अचानक आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. अनेकांनी आपले जिवलग गमावले. अशातच चोराखळी (ता.कळंब) येथील नवले कुटुंबावर नियतीने क्रूर घाला घातला आहे. कोरोनाने एकाच कुटुंबातील चौघे आई-वडिल व दोन मुले यांचा मृत्यू महिन्याच्या आत झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे चोराखळी गावावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांमध्ये हिंदीचे प्राध्यापक असलेले संजय नवले कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान 15 एप्रिलला त्यांचा मृत्यू झाला. याची बातमी पुण्यात असलेल्या त्यांच्या आई-वडिलांना कळाली. ऊस्मानाबादेत अंत्यविधोला उपस्थित राहिले. मात्र, तेथेच त्यांची प्रकृती बिघडली.
पुत्र वियोगाचा धक्का सहन न झाल्याने त्यांना उपचारासाठी रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं उपचार सुरू असताना त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात आलं आणि आई-वडिलांचाही 23 एप्रिलला कोरोनामुळे मृत्यू झाला. वडील माणिकराव नवले हे माजी शिक्षण शिक्षण आधिकारी होते. त्यांची पत्नी मंदाकिनी नवले (वय 78) यांचाही मृत्यू झाला. दोघांच्या मृत्यू मधलं अंतर होतं दोन तास होतं.
त्यानंतर पुण्यात उद्योजक असलेले सुनील नवले (वय 51) यांचाही कोरोनामुळे उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. मुळचे चोराखळी, ता. कळंब येथील रहिवाशी होते. शुन्यातून विश्व उभा करणाऱ्या कुटुंबातील चौघांचा 25 दिवसांच्या आत मृत्यू झाल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थांनाही धक्का बसला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.