पुणे -मुळशी तालुक्यातील आगीच्या घटनेतील 17 मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रूग्णालयात आणण्यात आले. मात्र, मृतदेह पूर्ण जळाल्यामुळे त्यांची ओळख पटत नसल्याने डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये पोलिसांची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय डीएन चाचणी करता येत नाही.
त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आज (दि. 8) संध्याकाळी सर्व डीएनए चाचण्या पूर्ण झाल्या, अशी माहिती बी. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी दिली.
मृतदेहांची ओळख पटविण्यासाठी डीएनए करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी मृतांच्या नातेवाइकांना बोलविण्यात आले. मात्र, या चाचण्यांसाठी आवश्यक कागदपत्र, अर्ज या सर्व प्रक्रियेला दिवस गेला. त्यामुळे ससून परिसरात मृतांच्या नातेवाइकांनी नाराजी व्यक्त करीत गोंधळ घातला.त्याबाबत डॉ. तांबे म्हणाले की, डीएनए चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबला कळविण्यात आले होते. मृतांच्या नातेवाइकांची ओळख पटविण्यासाठी काही प्रक्रिया आहे.
त्यानुसार पोलिसांनी त्याचा अर्ज नातेवाइकांकडून भरून घेणे अपेक्षित आहे. त्या नातेवाइकांचा फोटो असणे आवश्यक आहे. मृतांच्या नातेवाइकांची ओळख पटविताना प्रथम आई-वडील यांना प्राधान्य दिले जाते.
ते नसतील तर मुल, भाऊ, बहीण यांना प्राधान्य दिले जाते. ही प्रक्रिया वेळखाऊ आहे. त्यामुळे ओळख पटविण्याच्या प्रक्रियेला उशीर लागत आहे.
मृतांसह नातेवाइकांच्या रक्ताचे नमुने डीएनएसाठी घेण्याकरीता डीएनए किटची आवश्यकता असते. हे कीट न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेकडून पोलिसांना आणायचे असते. ते कीट ससून रूग्णालयात उपलब्ध नसते. त्यामुळे ते कीट आमच्याकडे नाही असा अपप्रचार झाला. ते चुकीचे आहे, असे तांबे यांनी स्पष्ट केले.