पिंपरी – तोडफोडीच्या घटना असो किंवा क्षुल्लक कारणावरून झालेली हाणामारी असो. पिंपरी चिंचवड शहरात घडलेल्या गुन्हेगारी घटनांवर नजर टाकल्यास अल्पवयीन मुले व तरुणांमध्ये संघटित गुन्हेगारी वाढत चालल्याचे दिसून येईल. ही गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे.
दारू पिताना झालेल्या भांडणावरून काळेवाडीतील एका टोळक्याने पिंपरीतील संजय गांधी नगर परिसरात येऊन वाहनांची तोडफोड केली. तसेच काळेवाडी परिसरात सोमवारी रात्री पूर्व वैमनस्यातून दोन गटात जोरदार हाणामारी झाली. या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांचा समावेश आहे. संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न फोल होताना दिसत आहेत. संघटित गुन्हेगारीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येते.
15 ऑगस्ट 2018 मध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन झाल्यानंतर आत्तापर्यंत आठ टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. यामध्ये जवळपास 60हून अधिक तरुणांना तुरूंगात पाठविण्यात आले आहे. तर यापूर्वी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी चिंचवड शहर असताना सुमारे 150 तरुणांवर मोक्काची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे पाच वर्ष तुरूंगात राहिल्यानंतर या तरुणांची सुटका होणार आहे.
शाळा-महाविद्यालयापासूनच सुरुवात
शाळा महाविद्यालयात असतानाच मुले संघटित गुन्हेगारीकडे वळत असल्याचे दिसून येते. आपण एकत्र राहिल्यास आपल्याला कोणी हातही लावणार नाही, आपण म्हणू ती पूर्व दिशा असणार आहे, असे या मुलांना वाटते. या प्रकाराकडे आई वडिलांचे होणारे दुर्लक्षही यास कारणीभूत ठरते. मुलाने एखादा मोठा गुन्हा केल्यानंतर पालकांचे डोळे उघडतात. मात्र तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो.
चित्रपटातून गुन्हेगारीचे होणारे उद्दात्तीकरण हे देखील संघटित गुन्हेगारीचे एक प्रमुख कारण आहे. खतरनाक खिलाडी दोन हा दाक्षिणात्य चित्रपट पाहून मित्राचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा प्रकार दापोडी येथे घडला. तर गुन्हेविषयक मालिका पाहून अनेकांना गुन्हा करण्याची प्रेरणा मिळाल्याचेही आपण वेळोवेळी पाहत आलो आहे. तर शाळा महाविद्यालयातही अनेकजण प्रेम प्रकरणातून गुन्हेगारीकडे वळल्याचे पाहायला मिळते.
प्रबोधन आणि कारवाई
संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी अल्पवयीन गुन्हेगार आणि त्यांचे पालक यांचे प्रबोधन करण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. याशिवाय गुन्हेगार दत्तक योजना राबवून त्यांना सुधरविण्याचा प्रयत्नही होत आहे. मात्र जे सुधारण्याच्या पलिकडे गेले आहेत, त्यांच्यावर संघटीत गुन्हेगारी विरोधी कायदा (मोक्का), झोपडपट्टी दादा विरोधी कायदा (एमपीडीए) आणि तडीपार सारख्या कारवाया करण्यात येत आहे. मात्र तरुणांवर चुकीने जरी एक गुन्हा दाखल झाला तर भविष्यात त्याला नोकरी मिळणे मुश्किल असते. यामुळे चुकीच्या संगतीमध्ये आपला मुलगा जाणार नाही, याची काळजी पालकांनी घ्यायला हवी.