पुणे – केंद्र सरकार देशातील दारुगोळा आणि आयुध निर्माणी कारखाना खासगीकरणाच्या प्रयत्नात आहे. मात्र, त्यास देशभरातील दारुगोळा आणि आयुध निर्माण कारख्यान्यांतील कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे.
केंद्र सरकारने हा निर्णय मागे घ्यावा. याकरीता आता कर्मचाऱ्यांच्या तीन संघटनांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडेच गाऱ्हाणे मांडले आहे. राष्ट्रपतींना दिलेल्या निवेदनात कारखान्यांना वाचविण्याची विनंती केली आहे.
ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज्ड फेडरेशन (एआयडीईएफ), इंडियन नॅशनल डिफेन्स वर्कर्स फेडरेशन (आयएनडीडब्लूएफ), भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ (बीपीएमएस) या तीन संघटनांनी राष्ट्रपतींकडे विनंती केली आहे. एआयडीईफचे अध्यक्ष एस. एन. पाठक,आयएनडीडब्लूएफचे अध्यक्ष अशोक सिंह, जनरल सेक्रेटरी आर. श्रीनिवासन, बीपीएमएसचे अध्यक्ष जी. थिरूकुमार, जनरल सेक्रेटरी मुकेश सिंह या पदाधिकाऱ्यांनी संघटनेच्या वतीने राष्ट्रपतींना निवेदन दिले.