डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय असुरक्षित औषधविक्री
नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांत भर पडलेले औषधींचे ऑनलाईन मार्केटिंग, हे तर लोकांच्या जीवनाशी चाललेल्या जीवघेण्या खेळाचे भीषण टोक आहे, याकडे लक्ष वेधत राजधानी दिल्लीतील अनेक डॉक्टर्सच्या संघटनांनी ऑनलाईन औषध विक्रीला पायबंद घालण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी केंद्रिय आरोग्य मंत्रालयाला निवेदन द्यायचा निर्णय घेतला आहे.
डॉक्टरने दिलेले प्रिस्क्रिप्शन ई-मेल अथवा व्हाट्सऍपवर पाठवले की, ती सारी औषधं बिलाच्या रकमेत सवलत अदा करून लोकांच्या दाराशी नेऊन देणारी यंत्रणा काही अपवादात्मक प्रकरणात उपयोगाची ठरत असली तरी अपवादात्मक परिस्थितीत अथवा इमर्जन्सीच्या वेळेस ग्राह्य मानता येऊ शकेल. पण म्हणून सरेआम त्याचे सार्वत्रिकीकरण करण्याचा अट्टहास सर्वच दृष्टीने घातक ठरत असल्याची उदाहरणे समोर येत असल्याच्या वास्तवाकडे या संघटनांनी सरकारचे लक्ष वेधले आहे.
आजघडीला या देशात निदान साडेआठ लक्ष लोक औषधविक्रीच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. याचा अर्थ, त्याच्या किमान पाच पट लोकांना त्या क्षेत्रात प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार प्राप्त होतो आहे. व्यवसाय आणि रोजगाराची ही व्यवस्था मोडकळीस आणणारी ऑनलाईन औषधविक्री व्यवस्था केवळ तेवढ्यासाठीच धोकादायक मानली जात नाही, तर या माध्यमातून झोपेच्या गोळ्यांपासून तर सेक्सशी संबंधित औषधींपर्यंत, बॉडी बिल्डिंगपासून तर गर्भपातापर्यंतच्या ज्या औषधी विनाप्रिस्क्रिप्शनही उपलब्ध होऊ लागल्या आहेत, ही बाब अधिक काळजी करायला लावणारी असल्याचे दिल्ली मेडिकल प्रॅक्टीशनर्स असोसिअएशनच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.
आधीच या देशातली खासगी वैद्यकीय व्यवस्था दिवसागणिक अविश्वसनीय होत चालली आहे. पेशंटचे हाल झाले तरी चालेल, पण डॉक्टरची कमाई झाली पाहिजे, अशा पद्धतीने त्याची रचना तयार झाली आहे. औषधनिर्मात्यांपासून तर डॉक्टर्सपर्यंतच्या लोकांचा सहभाग असलेली यंत्रणा पेशंटची लूट करत असताना “इथिकल प्रॅक्टीस’ करत असलेल्या वैद्यकीय व्यावसायिकांपुढे ऑनलाईन औषध पद्धतीने अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण होऊ शकते.
औषधनिर्मात्या कंपन्यांची विक्री वाढविण्याची जबाबदारी जणू आपल्याच खांद्यावर असल्याप्रमाणे पेशंटला त्या गोळ्या घेण्याची शिफारस करून, आपला व्यवसाय वाढवण्याची जी शर्यत या धंद्यातील लोकांमध्ये लागली आहे, ती खरोखरीच लाजिरवाणी आहे. अशात आता औषधविक्रीच्या असुरक्षित, जीवघेण्या ऑनलाईन व्यवसायाची भर पडते आहे. यातही शेवटी, छळ सामान्य माणसाचाच मांडला जाणार आहे, असे या संघटनेच्या पत्रकात म्हटले आहे.