पुणे – औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या भूखंडावर दिवसेंदिवस झोपड्यांची अतिक्रमणे वाढत आहेत. यावर कारवाई करून हे भूखंड अतिक्रमणमुक्त करावेत, असे आदेश महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी परिपत्रक काढून दिले आहेत.
काही वर्षांपासून “एमआयडीसी’ भागातील मोकळ्या भूखंडांवर झपाट्याने अतिक्रमण होत आहे. या भागात बऱ्याच ठिकाणी भूमाफियांकडून झोपड्यांचे साम्राज्य वाढत आहे. मात्र, या भागात “एमआयडीसी’ क्षेत्रीय अधिकारी, विभाग अधिकाऱ्यांकडून कारवाई होत नसल्याने हे अतिक्रमणाचे जाळे वाढत आहे. दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या या अतिक्रमणाला तेथील अधिकारीच जबाबदार असल्याचे या परिपत्रकात नमूद केले आहे. संबंधित अधिकारी अतिक्रमणावर वेळोवेळी कारवाई करत नसल्याने तसेच कारवाईकडे कानाडोळा करत असल्याने, आज परिस्थिती ओढवल्याचे यात म्हटले आहे.
“एमआयडीसी’च्या मोकळ्या भूखंडांवरील अतिक्रमणामुळे महामंडळाच्या मालमत्तेचे नुकसान होत आहे. या अतिक्रमणावर कारवाई करण्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित विभाग अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांचीच आहे, असेही स्पष्टपणे सांगण्यात आले.
“एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन यांनी पुन्हा परिपत्रक काढले आहे. यात कडक सूचना देण्यात आल्या असून अतिक्रमण रोखणे, भूमापक व अभियांत्रिकी विभागातील सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंत्यांनी वरिष्ठांना माहिती देणे, अतिक्रमण भागाचे सीमांकन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.