लॉकडाऊनमधील शासकीय नियमाचा केटरर्स व्यवसायाला मोठा आर्थिक फटका
– महादेव जाधव
कोंढवा – लॉकडाऊनमध्ये लग्नसमारंभ, डोहाळे जेवण, मुंज, जत्रा, यात्रा, उत्सव यासह सार्वजनिक सोहळ्यांवर पूर्णपणे बंदी होती. आता, यामध्ये बदल करून सुरक्षिततेच्या नियमांतर्गत लग्नसमारंभासाठी 50 जण उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही समाधानकारक बाब असली तरी यातून केटरर्स व्यावसायिकांवरील संकट मात्र टळलेले नाही. एका लग्नसमारंभात 500 ते 2 ते 3 हजार ताटांच्या जेवणाच्या ऑर्डर्स मिळत असताना 50 ताटांवर हा व्यावसाय कसा चालवायचा असा प्रश्न या व्यावसायिकांपुढे आहे.
लॉकडाऊनचा मोठा फटका बसलेल्या उद्योग, व्यावसायाच्या यादीत हॉटेल आणि केटरर्स व्यावसाय वरच्या क्रमांवर आहेत. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बाजारातील उलाढाल काहीशी सुरू झाली असली तर हॉटेल व्यावसायिकांना पार्सलवर समाधान मानावे लागत आहे. तर, मुहूर्त असताना सोहळे होत नाहीत. अगदी 10 ते 20 जणांच्या उपस्थितीतच असे कार्यक्रम उरकले जात आहेत. त्यामुळे जेवणाच्या ऑर्डर्स घेणे परवडत नाही. यामुळेच लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर व्यावसायाला उभारी मिळेल, अशी आशा फोल ठरली आहे.
लग्न समारंभाच्या हंगामात मार्च महिन्यापासून भरपूर ऑर्डर मिळतात. लग्नाच्या तारखेप्रमाणे केटरर्सच्या तारखा मिळण्यासाठी पूर्व नोंदणी करावी लागते. मात्र, ऐन लग्नसमारंभामध्येच करोनाचे संकट ओढवल्याने यंदाचा संपूर्ण हंगामच हातातून गेला आहे. शहर आणि ग्रामीण भागात केटरर्स व्यावसाय मोठ्या प्रमाणात चालतो. एका केटरर्सकडे कमीत कमी 20 ते 25 कामगार असतात. मोठा केटरर्स असल्यास कामगारांची संख्या 500 पेक्षा अधिक असते. परंतु, व्यावसाय अडचणीत आल्याने कामगारांसह या व्यावसायाशी निगडीत सर्वच जण आर्थिक अडचणीत सापडले आहे.