मुंबई – मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. चाळीसगाव आणि औरंगाबादमधील कन्नड तालुक्यात जमिनी खरडून वाहून गेल्या. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. नुकसान झालेले जिल्हे, गाव यांचे पंचनामे तातडीने कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आज राष्ट्रवादी भवन येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
अतिवृष्टी बाधित जिल्ह्यांचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांचा पाहणी दौरा करतील तसेच सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असून ते पूरग्रस्त भागावर लक्ष ठेवून आहेत, असे अजित पवार यांनी सांगितले.
औरंगाबाद-धुळे महामार्गावर मंगळवारी पावसानंतर भूस्खलन झाल्याने प्रचंड नुकसान झाले. 24 तासांच्या आत तेथे वाहतुक सुरू करायची होती पण भूस्खलनामुळे रस्तावर मोठे दगड आले आहेत.
पीडब्लूडी विभाग शर्थीने दगड बाजूला काढून वाहतूक पूर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहे. दगड बाजूला काढण्यासाठी ज्या काही साधनांची आवश्यकता आहे, त्याची पूर्तता करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.